मुंबई – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे जेव्हा अस्वस्थ असतात तेव्हा ते लगेच निर्णय घेऊन मोकळे होतात. शिवाय दगाफटका करण्यात ते माहिर आहेत. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी शक्यता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वर्तविली आहे. तसेच महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचं पिक येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले, सद्यस्थितीत नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले तर त्यांना भाजपाचं मांडलिक व्हावे लागेल. नितीश कुमार यांच्या स्वभावाला ते साजेसं नाही. त्यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप होणे शक्य आहे.
नितीश कुमार यांनी माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत दगाफटका केला. राजदचे नेते लालूप्रसाद यादव आणि ते तर सत्तेत होते. लालूप्रसाद यादव यांच्यासोबतही त्यांनी दगा केला. एनडीएलाही त्यांनी दगा दिला होता. त्यामुळे नितीशकुमार नेमकं काय करतील याची आत्ता तरी श्वाश्वती देता येणार नाही, असेही ते म्हणाले.
चिराग पासवान यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले, चिराग पासवान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते अमित शहा यांच्या शब्दाबाहेर असतील असे वाटत नाही. पासवान यांना आवर घालणे शक्य नव्हते, असं कोण म्हणेल? मोदी आणि शहा यांनी मनात आणले असते तर त्यांचं बंड मोडूनही काढले असते. मात्र त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांचं किमान 20 जागांवर तरी नुकसान केले, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याबद्दल विचारले असता राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. नारायण राणे यांनी ऑपरेशन लोटस होणार सांगितले असले तरीही महाविकास आघाडीचं सरकार हे पाच वर्षे व्यवस्थित चालेल, असा दावा संजय राऊत यांनी केला.