नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा यांनी आज कॉंग्रेस पक्ष आणि या पक्षाच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. कॉंग्रेसचे कर्नाटकात सरकार येण्याची किंचितही शक्यता नाही.
त्यांनी केवळ तुष्टीकरणाचेच राजकारण केले. या लोकांनी अगोदर जय श्रीराम घोषणा कुलुप लावून बंद करून टाकली. आता त्यांना जय बजरंगबलीही बंद करून टाकायचे आहे. कर्नाटकची जनताच त्यांना याचे उत्तर देईल असे शहा म्हणाले.
शहा म्हणाले की कॉंग्रेस आता हनुमानाच्या नावाचाही तिरस्कार करते आहे. पीएफआय या संघटनेशी बजरंग दलाची तुलनाच होऊ शकत नाही. मुसलमानांना चार टक्के आरक्षण पुन्हा बहाल केले जाण्याची घोषणा कॉंग्रेसने केली असली तरी ते शक्य नाही.
कर्नाटकात पुन्हा भारतीय जनता पार्टीचेच सरकार येणार आहे. किंबहुना आमचे जे अनुमान आहे त्यापेक्षा 15 जास्त जागा आम्हाला मिळतील. मी जेथे जेथे जातो आहे तेथे मला लोकांचा उत्साह आणि आनंद दिसून येतो आहे. त्या आधारावरच मी असे म्हणू शकतो की पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे.