नवी दिल्ली – आमचे कपडे, आमचा पेहराव आमच्या ओळखीशी जोडला गेला आहे. देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी सहकाऱ्यांपासून ते बर्फाच्छादित पर्वतांपर्यंत, वाळवंटापासून ते समुद्राच्या विस्तारापर्यंत आणि भारताच्या मैदानापर्यंत, आम्हाला पोशाखांचे सुंदर इंद्रधनुष्य मिळाले आहे. हातामागासह विविध स्वदेशी वस्तूंच्या वापरातून देशात एक अनोखी क्रांती होत असून आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
‘राष्ट्रीय हातमाग दिन’ सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या भारत मंडपममध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमत मोदी बोलत होते. ते म्हणाले की, भारत मंडपमच्या या भव्यतेमध्ये भारताच्या हातमाग उद्योगाचाही महत्त्वाचा वाटा आहे. प्राचीन आणि नव्याचा हा संगम आजच्या भारताची व्याख्या करतो.
स्वातंत्र्यासाठी दिलेल्या प्रत्येक बलिदानाचे स्मरण करण्याची हीच वेळ आहे. या दिवशी “स्वदेशी चळवळ’ सुरू झाली. स्वदेशीची ही भावना केवळ विदेशी कपड्यांवर बहिष्कार घालण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती आपल्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मोठी प्रेरणा देणारी होती. भारतातील लोकांना आपल्या विणकरांशी जोडण्याची ही मोहीम होती.
वस्त्रोद्योगाला महत्त्व न दिल्याबद्दल आधीच्या सरकारांवर हल्लाबोल करत पंतप्रधान मोदी म्हणाले, एवढी प्रचंड आर्थिक ताकद असलेल्या वस्त्रोद्योगाला स्वातंत्र्यानंतर पुन्हा चालना देण्यावर फारसा भर दिला गेला नाही, हेही दुर्दैव आहे. परिस्थिती अशी होती की खादीही मरणासन्न अवस्थेत पडली होती. खादी परिधान करणाऱ्यांना लोक कमी लेखत असत. वर्ष 2014 पासून आमचे सरकार ही परिस्थिती आणि विचार बदलण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काही दिवसांत रक्षाबंधनासह गणेशोत्सव आहे. तसेच दसरा, दीपावली, दुर्गापूजा अशा सणांना आपल्याला आपला स्वदेशीचा संकल्प पुढे न्यायचा आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडीत परंपरा केवळ जिवंत न राहता त्या नव्या अवतारात जगाला आकर्षित कराव्यात, असा शासनाचा प्रयत्न आहे. म्हणूनच आम्ही या कामाशी संबंधित सहकाऱ्यांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि कमाई यावर भर देत आहोत. आम्ही विणकर आणि हस्तकलाकारांच्या मुलांच्या आकांक्षांना उड्डाण देऊ इच्छितो, असेही मोदींनी सांगितले. देशातील रेल्वे स्थानकांवर हातमाग उत्पादनांच्या विक्रीसाठी खास स्टॉल्स लावले जात आहेत. आपल्याला आपले हातमाग, खादी आणि वस्त्रोद्योग क्षेत्र जागतिक चॅम्पियन बनवायचे आहे.