नवी दिल्ली – गेल्या काही काळापासून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. त्यांनी कथित वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू केली आहे. आताही त्यांनी सरकारला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे विधान केले आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आपल्याला गप्प राहण्याचा इशारा देण्यात आला होता, असा दावा मलिक यांनी केला आहे. दरम्यान, मलिक यांच्या या विधानानंतर कॉंग्रेसने केंद्र सरकारला लगेच लक्ष्य केले आहे.
मोदी यांची रेवडी: सरकारच्या विरोधात बोलू नका, माझे पितळ उघडे पाडू नका, उपराष्ट्रपती बनवतो असे सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावणारे ट्वीट कॉंग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे. खरे बोलू नका, उपराष्ट्रपती बनवतो अशी आपल्याला ऑफर होती असे मलिक यांचे म्हणणे आहे. मोदीजी मोठेच कलाकार आहेत अशी टिप्पणी यावरून करण्यात आली आहे.
दरम्यान, आपण पंतप्रधानांचे समर्थन करतो, मात्र त्याचसोबत आपले मतही मांडत असतो असे मलिक यांनी म्हटले आहे. मला जे वाटते, जाणवते ते मी बोलतो. त्यासाठी भले मला काहीही करावे लागले तरी चालेल. याचा अर्थ मी मोदी सरकारच्या विरोधात आहे असा होत नाही असेंही मलिक यांचे म्हणणे आहे.