नागपूर – कॉंग्रेस ज्या ठिकाणी चुकत आहे, त्यावर पृथ्वीराज चव्हाण थेट बोलत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाकडून वाईट वागणूक मिळत असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. आता विधानसभेत त्यांना चौथ्या रांगेत बसवण्यात आले होते. पृथ्वीराज चव्हाण कॉंग्रेसच्या विरोधात बोलले म्हणजे ते भाजपाच्या संपर्कात आहेत, असे होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बावनकुळे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा. कारण तो त्यांचा विषय आहे. विस्तार कधी करायचा आणि कोणाला कोणती खाती द्यायची हे मुख्यमंत्री आणि उपमख्यमंत्री यांचा अधिकार आहे.
तसेच अजून कोणतीही यादी राज्यपालांकडे दिलेली नाही. या मीडियाने तयार केलेल्या बातम्या असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उत्तर महाराष्ट्रात छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांचे आव्हान आहे का? असा सवाल देखील त्यांना विचाराला, यावेळी ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात कोणाचेही आव्हान नसल्याचे त्यांनी सांगितले.