पाटणा – “श्री राम देव नाही तर एक काल्पनिक पात्र आहे. त्याचबरोबर रावणही रामायणमधील काल्पनिक पात्र आहे. मात्र कल्पनेच्या आधारावर जो ग्रंथ लिहिला गेला आहे, त्यामध्ये रावणासोबत अन्याय केला गेला आहे. रामायणमध्ये रावणाला क्रुर दाखवून रामाची प्रतिमा मोठी करण्यात आली.
मात्र कर्मकांडाच्या बाबतीत रावण श्री रामाहून खूप पुढे आहे. रावणाचे चरित्र याबाबतीत रामपेक्षा मोठे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी केले आहे. तसेच आपले हे मत पूर्णपणे वैयक्तिक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मांझी बोलताना पुढे म्हणाले, राम जेव्हा जेव्हा एखाद्या संकटात किंवा समस्येत असत तेव्हा त्यांना अलौकिक शक्तींकडून मदत मिळत होती. मात्र रावणासोबत असे काही होत नव्हते. रामायण ग्रंथाच्या लेखकाने कल्पनेच्या बाबतीतही रावणाला कनिष्ठ दाखवले आहे.
जीतन राम मांझी यांनी यापूर्वीही हिंदू धर्म आणि श्री राम यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली आहेत. यापूर्वीही मांझी यांनी रामायण व श्री रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सत्यनारायण पूजेबाबतही वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, दलितांनी सत्यनारायण पूजा करू नये. जीतन राम मांझी यांनी ब्राह्मणांबाबतही वादग्रस्त टिप्पणी केली होती व यावर टिका होताना त्यांनी संक्रांतीच्या निमित्त पाटण्यात ब्राह्मण भोज आयोजित केले होते.