पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येत असलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सतत काही ना काही कारणाने सतत विघ्नच येत आहेत. यामुळे ही शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवरच पडत चाललेली आहे. आता ही परीक्षा मे अखेरीस होण्याची शक्यता आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीत घेतली जाते. मात्र, करोनामुळे वेळापत्रक कोलमडले होते. चालू शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्याची घोषणा करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा मुदत वाढवून देण्यात आली होती. सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे.
परीक्षा परिषदेत “ओएमआर’ बेस परीक्षा घेण्यासाठी विनर सॉफ्टवेअर प्रा.लि. ही एकमेव कंपनी आहे. “टीईटी’ घोटाळ्याशी या कंपनीचा काहीही संबंध नसतानाही या कंपनीचे काम तूर्त थांबविण्यात आले आहे.
एनटीएस, एनएमएमएस या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा परिषदेने संगणक कंपन्यांकडून दरपत्रक मागविले आहे. दरम्यान, विनर सॉफ्टवेअर कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितली. त्यामुळे परीक्षा कोण घेणार? याचा तिढा कायमच राहिला आहे. परीक्षा होणार की नाही, होणार असल्यास ती कधी होणार याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.