मुंबई – उद्धव ठाकरे यांचे सरकार मराठा समाजाला त्यांच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आडकाठी करीत आहे, ही राज्यातील अघोषित आणिबाणीच आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
काल फडणवीस यांनी रिपब्लीक टीव्हीच्या सीईओंना अटक करण्याच्या प्रकरणाचा उल्लेख करून राज्यात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा दावा केला होता. त्यांचा हा दावा खोडून काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडूनच देशातील विविध घटकांची मुस्काटदाबी करून आणीबाणीजन्य स्थिती निर्माण केली जात असल्याचा पलटवार केला होता. आज त्यावर फडणवीस यांनी पुन्हा अघोषित आणीबाणीचा आरोप केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या संबंधात बोलण्याऐवजी महाराष्ट्रातील स्थिती बाबत प्रथम बोलले पाहिजे. ते म्हणाले की आरक्षणाच्या विषयावर मराठा संघटनांना राज्यात आंदोलन करायचे आहे पण त्यांना ते करू दिले जात नाही.
राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने एक रूपयांचीही मदत केली नाही असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री अमेरिका, रशिया, दिल्लीत काय घडते यावर भाष्य करतात पण महाराष्ट्रात त्यांनी काय केले आहे त्यावर ते काही बोलत नाहीत. राज्यातले मंत्रीही त्यांनी काय केले यावर भाष्य करतील त्यावेळी ते उघडे पडतील असा आरोपही त्यांनी केला.