- कच्चा मालाच्या दरात 40 ते 50 टक्क्यांनी वाढ
- ऑर्डर पूर्ण करुन देणे झाले अशक्य
पिंपरी – लॉकडाऊनच्या काळात शहरातील अनेक उद्योजक आर्थिक विंवचेनत सापडले होते. दरम्यान उद्योग सुरु करण्यास परवानगी मिळाली आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत उद्योगनगरीतील यंत्राचा खडखडाट पुन्हा सुरु झाला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना चांगले दिवस दिसू लागलेले असतानाच आता कच्च्या मालातील काळाबाजारीने उद्योजकांसमोर मोठे संकट उभे केले आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात कच्च्या मालाच्या दरात तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाल्याने उद्योजकांना आता हातातील ऑर्डर पूर्ण करणे अशक्य झाले आहे.
उद्योगनगरीत सुमारे दहा हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आहेत. हे सर्व उद्योग मोठ्या ऑटोमोबाइल, इंजीनियरिंग, फॅब्रिकेशन कंपन्यांकडून मिळणाऱ्या ऑर्डर्सवर काम करतात. वेगवेगळे सुटे पार्टस बनविणाऱ्या या उद्योगांना स्टील, कॉपर, स्टेनलेस स्टील, प्लास्टिक अशा कच्च्या मालाची गरज भासते. गेल्या काही दिवसांमध्ये या कच्च्या मालाच्या उत्पादकांनी मनमानी सुरु करत दर वाढविण्यास सुरुवात केली. मे महिन्याच्या मध्यास 37 रुपये किलो असणारा कच्चा माल आता 57 ते 65 रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
जुन्या ऑर्डर्स पूर्ण करणे अवघड
मोठ्या कंपन्या लघु आणि मध्यम उद्योजकांना एकाच वेळी ऑर्डर देऊन डिलिव्हरीचे शेड्यूल ठरवून देतात. ऑर्डर देताना कच्च्या मालाचा दर लक्षात घेऊन पर्चेस ऑर्डर दिली जाते. प्रतिस्पर्धेच्या या युगात खूपच कमी मार्जिन ठेऊन मध्यम आणि लघु उद्योग या ऑर्डर स्वीकारतात. आता कच्च्या मालात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने जुन्या दरात ऑर्डर पूर्ण करणे अशक्य झाले आहे. तसेच कंपन्याकडे दरातील एवढी मोठी तफावत भरुन मिळण्याची शक्यताही कमीच आहे.
कंपन्यांची मक्तेदारी : विक्रेत्यांची मनमानी
गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या मालाची आयात बंद आहे. यामुळे भारतीय कंपन्यांनी आता मक्तेदारी सुरु केली आहे. कधी कोळसा महाग झाला, तर कधी मेन्टेनन्सच्या नावाखाली दर वाढविले जातात. आयात कमी झाल्याने स्थानिक कंपन्यांना आयाती मक्तेदारी मिळाली असून याचा गैरफायदा घेण्यात येत आहे. काही कच्चा मालांचे दर रोज बदलत असल्याचे सध्या दिसून येत आहे. सकाळी वेगळा तर सायंकाळी वेगळा दर दिसून येत असल्याने उद्योजक पुरते वैतागले आहेत. या मक्तेदारीचा पुरेपूर फायदा ट्रेडर अर्थात विक्रेते देखील घेत आहेत. या विक्रेत्यांनीही भाववाढीत कोणतीच कसर बाकी ठेवली नाही.
शॉर्टेजच्या नावाखाली पिळवणूक
सध्या विक्रेते शॉर्टेजचा जप करत आहेत. शॉर्टेजमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढविण्याचा काय संबंध? असा प्रश्न उद्योजक उपस्थित करत आहेत. उद्योजकांना सध्या गरज असल्याचे लक्षात घेत रोखीतच विक्री करण्याचा आग्रह विक्रेते घेत आहेत. पूर्वी उधार मालाला दर किलोला एक रुपया अतिरिक्त आकारला जायचा आता दर किलोला दीड ते पाऊने दोन रुपये आकारले जात आहेत. विक्रेत्यांच्या या मनमानीचा खूपच विपरीत परिणाम उद्योगांवर पडत असून गेल्या एक महिन्यांपासून बहुतेक उद्योजकांनी नवीन ऑर्डरच घेतलेल्या नाहीत.
कोणाचेच नियंत्रण नाही
ऑटोमोबाइलसाठी लागणारे स्टील, कॉपर, स्टेनलेस, प्लास्टिक तर इंजीनियरिंगसाठी लागणारे पत्रा, प्लेट, अँगल, चॅनल अशा सर्वच बाबींचे दर सातत्याने वाढत आहेत. उद्योगावर याचे विपरीत परिणाम होत असतानाही सरकार किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेकडून यावर नियंत्रण आणले जात नसल्याने दर वाढविण्याची मक्तेदारी आणि मनमानी वाढतच चालली आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये दोन ते तीन वेळा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी तर अधिकच गंभीर परिस्थिती आहे. ही स्थिती अजून एखादा महिना अशीच राहिल्यास जुन्या ऑर्डर पूर्ण होणार नाहीत आणि उत्पादन थांबेल. कच्च्या मालाच्या दरावर सरकारने नियंत्रण आणलेच पाहिजे, अन्यथा उद्योगांना आपले काम सुरु ठेवणे अवघड होईल. याबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दर नियंत्रणाची मागणी करत आहोत.
संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी–चिंचवड लघु उद्योग संघटना