नवी दिल्ली – देशभरात आजपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या 4 लाख 80 हजारांपर्यंत कमी झाली आहे. पॉझिटीव्ह रूग्ण आणि सक्रीय रुग्ण यांचे प्रमाण कमी होऊन ते आता 5.48 टक्के इतके झाले आहे.
नव्या रुग्णांपेक्षा नव्या बरे झालेल्या रूग्णांचे प्रमाण दररोज वाढत असून आज 44 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली, तर गेल्या 24 तासांत 47 हजार 992 रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे.
गेले 5 आठवडे नवीन रूग्णांची सरासरी संख्या कमी होत असल्याचे दाखवत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांपर्यंत आला आहे. एकूण राष्ट्रीय दर 93.05 टक्के इतका आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 81 लाख 63 हजार 572 इतकी आहे.
बरे झालेल्या रूग्णांपैकी 75.38 टक्के रूग्ण 10 राज्यांमधील आहेत. गेल्या 24 तासांत दिल्लीत सर्वाधिक रूग्ण बरे झाले असून, रुग्णांची संख्या 6 हजार 498 इतकी आहे. केरळमध्ये 6 हजार 201 रुग्ण दररोज बरे होत असून महाराष्ट्रात 4 हजार 543 रुग्ण बरे झाले आहेत.
दिल्लीत गेल्या 24 तासांत रूग्णसंख्या वाढून त्यात 7,802 अधिक रुग्णांची भर पडली आहे. केरळमध्ये नव्या 5,804 रूग्णांची नोंद झाली आहे तर महाराष्ट्रात काल 4,132 रुग्णांची नोंद होऊन तो तिसऱ्या स्थानावर आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात 520 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात 127 मृत्यूंची नोंद झाली. त्यानंतर दिल्लीत 91 तर पश्चिम बंगाल येथे 51 रूग्ण मरण पावले आहेत.