पाटणा – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना सोमवारी पाटणा उच्च न्यायालयाने दिलासा दिला. राहुल यांच्या विरोधात पाटण्यातील विशेष न्यायालयात मानहानीचा खटला दाखल आहे. त्या खटल्याच्या कामकाजास उच्च न्यायालयाने 15 मे पर्यंत स्थगिती दिली.
राहुल यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीवेळी कर्नाटकमधील सभेत बोलताना मोदी आडनावाविषयी टिप्पणी केली होती. त्यावरून बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला.
त्या प्रकरणी राहुल यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. गुजरातच्या सुरतमधील न्यायालयाने याआधीच अशाच प्रकरणात मला दोषी ठरवले. त्यामुळे समान प्रकरणात वेगळा खटला चालवला जाऊ शकत नाही, अशी भूमिका मांडणारी याचिका राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. त्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.
संबंधित प्रकरणात विशेष न्यायालयाने राहुल यांना 25 एप्रिलला हजर राहण्यास सांगितले होते. सुरत न्यायालयाने दोन वर्षे तुरूंगवास ठोठावल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली.