पुणे – माणसाची काया मर्त्य असली तरी जीवनभर मनुष्य ज्या गुणांची उपासना करतो त्या गुणांमुळेच त्याची कीर्ती चिरंजीव नांदत राहते. भारतीय परंपरेमध्ये विख्यात असलेल्या सप्तचिरंजीवांची संकल्पना हेच वास्तव अधोरेखित करते, असे प्रतिपादन विख्यात कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्यू ह. भ. प. चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी आज येथे केले. अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम या भारतीय परंपरेमधील सात चिरंजीव व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रांचे प्रकाशन देगलूरकर महाराज यांच्या हस्ते झाले.
व्यक्तिगत तसेच सार्वजनिक जीवनाच्या धारणेसाठी उपकारक ठरणा-या गुणांचा परमोत्कर्ष आपल्या जीवनामध्ये साधण्याची प्रेरणा सात चरित्रग्रंथांचा हा संच समाजमनाला खचितच देईल असा विश्वासही त्यांनी या वेळी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केला. पुण्यातील श्री गंधर्ववेद प्रकाशन या प्रकाशन संस्थेने पुस्तकरूपाने सिद्ध केलेल्या सप्तचिरंजीवांच्या चरित्रकहाणी संचाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान देगलूरकर महाराज बोलत होते. वैदिक संशोधन मंडळाचे सहसंचालक आणि दैवतविज्ञान व वैदिक साहित्याचे व्यासंगी संशोधक प्रणव गोखले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर, ज्येष्ठ विचारवंत आणि मराठी लोकच्यवहाराचे व्यासंगी भाष्यकार डॉ. सदानंद मोरे हे प्रमुख पाहुणे या नात्याने प्रकाशन सोहळ्यास उपस्थित होते.
प्राचीन काळी होऊन गेलेल्या घटनांना शब्दालंकृत करून पूर्वकाळ आणि वर्तमानकाळ यांना जोडणारा सेतू निर्माण करणे हे पुराणांचे वैशिष्ट्य असल्यामुळेच, पुराणसाहित्यामध्ये शब्दबद्ध झालेल्या गतेतिहासाचे दस्तऐवजीकरण विलक्षण दक्षतेने आणि तारतम्याने केले जाणे अगत्याचे ठरते, असे प्रतिपादन प्रणव गोखले यांनी त्यांच्या अध्यक्षीय विवेचनादरम्यान व्यक्त केले. त्यासाठी, मुळात आपल्या पूर्वकालीन संस्कृतीमध्ये नेमके काय काय साकारले याचा साक्षेपी शोध घेण्याची एक दिशा या चरित्रकहाणी ग्रंथसंचाद्वारे उजळली असून हे सातही चरित्रग्रंथ अव्वल संदर्भग्रंथ म्हणून सतत मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास गोखले यांनी व्यक्त केला.
पूर्वेतिहासाचा धांडोळा घेण्याची आपल्या अध्ययनविश्वातील प्रचलीत संशोधनप्रणाली पाश्चात्य विद्यापरंपरेच्या मुशीमधून साकारलेली आहे. मात्र, भारतासारख्या विशाल, बहुढंगी आणि प्राचीन संस्कृतीचे पाथेय लाभलेल्या देशाच्या गतकालाचे अध्ययन करण्यासाठी पाश्चात्य चौकट पुरेशी ठरत नाही. भारतीय संस्कृती व परंपरेचे देशी जाणिवांच्या माध्यमातून आकलन करू न घेण्याचा एक पर्याय या सात चरित्रग्रंथांच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे, असे प्रतिपादन डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या मनोगतादरम्यान व्यक्त केले.
श्री गंधर्ववेद प्रकाशन संस्थेचे अध्वर्यु दीपक खाडिलकर यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले.