बीड – भारतीय जनता पार्टीच्या (bjp) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (pankaja munde) या पक्षावर गेल्या काही वर्षांपासून नाराज आहेत. त्यांची पक्षात कोंडी होत असल्याची चर्चा आहे. तसेच भाजपकडून त्यांना वेळोवेळी डावलले जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पंकजा मुंडे यांनी नुकतीच शिवशक्ती परिक्रमा यात्रा केली. यावेळी त्यांचे ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात स्वागत केले गेले. राज्यभरात त्यांच्या या यात्रेची आणि यात्रेला मिळणाऱ्या प्रतिसादाची चर्चा झाली. मात्र त्यानंतर आता त्या त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत (Vaidyanath Cooperative Sugar Factory) चर्चेत आल्या आहेत. 19 कोटी रुपये जीएसटी थकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर पंकजा यांची पक्षावरील नाराजी उघडपणे दिसून येत आहे.
नोटीसीनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना दिल्लीत त्यांना मदत मिळाली नसल्याचे सांगितले. इतर 8-9 कारखान्यांना मदत मिळाली मात्र त्यांनाच मदत मिळाली नसल्याचे त्यांनी समाजमाध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यामुळे तो वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अद्याप त्यांना अमित शाह यांच्याकडून भेटीसाठी वेळ मिळाला नाही.
दरम्यान या घटनेनंतर पंकजा मुंडे यांची पक्षात घुसमट होत असल्याचे बोलले जात आहे. पक्षात होणाऱ्या घुसमटीबद्दल याआधीही अनेकदा चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे या आगामी काळात वेगळा निर्णय घेऊ शकतात, असा दावा त्यांच्या विरोधकांकडून सातत्याने होत आहे. या सगळ्यावर पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका मांडली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, जसे एखादे विवाहबंधन असते, तसेच आपल्या संघटनेशी आपले एक बंधन असते. आपण नकळत एकमेकांना वचने दिलेली असतात, आणाभाका घेतलेल्या असतात, शपथा घेतलेल्या असतात, शब्द दिलेले असतात. आपण एका विचारधारेवर प्रेम केलेले असते. त्यामुळे असा निर्णय एखाद्या व्यक्तीला घ्यावा लागत असेल तर ते त्याच्यासाठी वेदनादायी असते. माझ्यासाठी तर ते प्रचंड वेदनादायी असेल. कारण मी माझ्या वडिलांना या संघटनेत पाहिले आहे. त्यामुळे या संघटनेशी माझे वेगळे नाते आहे. त्यामुळे असा निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर येऊच नये, अशी माझी प्रार्थना आहे. ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो. मी निर्णय घेईल तेव्हा ती तुम्हा सगळ्यांना बोलावून सांगेल. उगीच सगळ्यांनी आपली डोकी लावून बातम्या करू नका. त्याचा माझ्या राजकीय कारकीर्दीवर वाईट परिणाम होतो.
काय आहे प्रकरण?
सध्या पंकजा मुंडे चर्चेत आहेत त्याचे महत्वाचे कारण म्हणजे, परळी तालुक्याती पांगरी येथे असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना. पंकजा मुंडे या साखर कारखान्याच्या चेअरमन आहेत. हा कारखाना गेली दीड वर्षांपासून बंद आहे. या कारखान्याचे साहित्य पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही थकीत आहे. जीएसटीची 19 कोटी रूपयांची रक्कम या कारखान्याकडे थकीत आहे. सहा महिन्यांपूर्वी जीएसटी अधिकाऱ्यांनी कारखान्यात येऊन धाड मारली. त्यानंतर 19 कोटी रक्कम भरण्यासंदर्भात नोटीस दिली. अन्यथा मालमत्ता जप्ती करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले.
हा कारखाना सध्या बंद असून एका बॅंकेच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. बॅंकेकडून या कारखान्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचीही चर्चा होती. पण हा लिलाव झाला नाही. जर ही रक्कम भरली नाही तर कारखान्यातील काही मशिनरी जप्त करण्यात येणार असल्याचे 23 तारखेला दिलेल्या नोटीसमध्ये सांगतले आहे. या संदर्भातील एक पत्रक जीएसटी अधिकाऱ्यांनी गेटवर लावले आहे. पण याबाबत अधिकृतपणे बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. जप्त केलेल्या मशिनरीचा लिलाव करून कर वसूली करण्यात येणार असल्याचं बोलले जात आहे. ही कारवाई टाळण्यासाठी पंकजा मुंडे यांनी दिल्ली दरबारी मदतीची याचना केली मात्र तिथे त्यांना कोणतीही मदत मिळाली नसल्याचे त्या सांगत असून यामधून पक्षावरील त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसत आहे. त्या पुढे काय निर्णय घेतील हे पहावे लागणार आहे.