औरंगाबाद – वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागला म्हणून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील किराडपुरा भागात घडली आहे. एका पाच वर्षाच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त सर्व नातेवाईक एकत्र आले होते त्यावेळी ही घटना घडली. सय्यद माजित सय्यद पाशा (वय 35, रा. किराडपुरा) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून मजर पठाण, मुज्जू पठाण, अरबाज पठाण, सलमा पठाण (सर्व रा. किराडपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती आणि आरोपी जवळचे नातेवाईक आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री (दि. 23) जीन्सी भगातील किराडपुरातील बदामगल्लीत नात्यातील पाच वर्षीय चिमुकल्याचा वाढदिवस होता. त्यासाठी नातेवाईक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. वाढदिवसानंतर पाहुण्यांनी डान्स करण्याचा आनंद घेतला. मात्र यावेळी नाचताना मजीदचा धक्का आरोपीला लागला. दोघांमध्ये सुरवातीला वादविवाद झाला आणि पाहता-पाहता हाणामारी सुरु झाली. इतर नातेवाईकांनी मध्यस्थी करून त्यावेळी भांडण सोडवले. पुन्हा काही वेळेत आरोपीकडील लोकं हातात तलवार चाकू घेऊन पुन्हा आले आणि मृत माजीद आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर जोरदार हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यात माजीद, सय्यद जावेद, सय्यद वाजेद, सय्यद अजीज रक्ताच्या थरोळ्यात जमिनीवर पडले. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.
उपस्थित नातेवाईकांनी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील सय्यद माजिद सय्यद पाशा याला तपासून डॉक्टरांनी मयत घोषीत केले. तर आणखी तिघांवर उपचार सुरु असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांना दिली आहे. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यता घेतले असून इतर आरोपींचा शोध घेत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये किरकोळ कारणावरून एकमेकांचा जीव घेण्याचे प्रमाण वाढत असून हे चिंताजनक आहे. भांडण टाळणे, किंवा भांडणावेळी कमीपणा घेणे, चुक असल्यास माफी मागणे गरजेचे आहे.