आळंदी देवाची (पुणे) – सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन आहे. याचा योग्य वापर केल्यास सामाजिक, देशहित साधण्यासाठी मोठा फायदा होतो. हाच विचार करून तीर्थक्षेत्र आळंदी येथील युवकांनी 10 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘आळंदी विकास युवा मंच’च्या माध्यमातून शहरातील समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासह शहराचा विकास साधण्यासही मदत होत आहे.
‘आळंदी विकास युवा मंच’समूहातील सदस्यांनी सांगितले की, 2013 साली हा ग्रुप सुरू करण्यात आला. या समूहात सध्या 226जण सहभागी आहेत. त्यामध्ये शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, डॉक्टर, वकील, उद्योजक आदी सर्व घटकांतील व्यक्तींचा समावेश आहे. विविध कारणांमुळे शहरात उद्भवलेल्या समस्यांबाबत ग्रुपवर चर्चा करण्यात येते. त्याबाबत प्रशासनाला विनंती करून, निवेदन देऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. समूहात सर्व घटकातील व्यक्ती असल्यामुळे ते आपापल्या पातळीवर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. विशेष म्हणजे या समूहात कधीही कोणावर वैयक्तिक टीका केली जात नाही. किंवा जाणून बुजून कोणाला त्रास देण्याच्या उद्देशाने चर्चा केली जात नाही. समूहातील सर्वजण परिवाराप्रमाणे राहतात, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. शहरातील समस्या सोडविणे आणि विकासास हातभार लावणे हाच या समूहाचा मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, प्रत्येक गावात, शहरात असा ग्रुप असणे आवश्यक आहे. ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविल्या जातील आणि समाजहित साधने शक्य होईल.