पुणे – “दोन वर्षांची वाट कशाला पाहता. तुम्ही राजीनामा द्या, मी पण राजीनामा देतो आणि होऊ द्या, दूध का दूध अन् पाणी का पाणी,’ असे सांगत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना मंगळवारी थेट आव्हान दिले. जर आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला तर अब्दुल सत्तार राजीनामा देणार आहेत.
वैकुंठ मेहता संस्थेतील कार्यक्रमानंतर सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आदित्य ठाकरे यांनी आमदारांना दोन वर्षांनंतर कळेल की निवडणूक काय असते,’ असा टोला लगावला होता. त्यावर सत्तार म्हणाले, “दोन वर्षे कशाला, आताच तुम्ही राजीनामा द्या. मी पण माझ्या मतदारसंघातून राजीनामा देतो आणि आपली पहिलीच टेस्ट होऊन जाऊ द्या. त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर मी आठवडाभरात मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली की लगेच राजीनामा देतो.’
दरम्यान, “अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. ओला दुष्काळ जाहीर केला की, 32 टक्के उसाचे क्षेत्र राज्यात आहे. मग त्यांनाही मदत द्यायची का? त्यांना जर दिली तर ज्यांचे नुकसान झाले त्यांचे काय हाल होणार आहेत,’ याकडे सत्तार यांनी लक्ष वेधले.
ओल्या दुष्काळाची परिस्थिती नाही
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा पाहिला. औरंगाबादेत अडीच तासांच्या दौऱ्यात 24 मिनिटे शेतकऱ्यांशी बोलले. आम्ही 24 दिवसांपासून फिरत आहोत. आम्हांला अजूनही ओल्या दुष्काळाची परिस्थिती दिसली नाही. यांना 24 मिनिटांमध्ये काय दिसले असेल ते मला माहीत नाही, असे म्हणत सत्तार यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “पिता-पुत्रांनी राजकारणासाठी बांधावर जाऊन फोटो काढणे वेगळे आहे. ते स्वत: जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी अनेक घोषणा केल्या होत्या. पण त्याची त्यांना आठवण राहिली नाही,’ अशी टीकाही अब्दुल सत्तार यांनी केली.