पुणे – आज जग कोरोनाच्या महासाथीच्या भयानक संकटातून जात आहे. आपल्या देशाच्या दृष्टीने तर हे संकट आपली अर्थव्यवस्था आणि देशातील कष्टकऱ्यांचा कणा मोडणारे आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशाने एकजुटीने, न घाबरता पण विज्ञानाचा आधार घेत उभे राहिले पाहिजे. देश कष्टकऱ्यांच्या कष्टावर उभा रहातो. अशा परिस्थितीत कष्टकरी वाचविला पाहिजे. लोकनेते भाई वैद्य हे आयुष्यभर गोर गरीबांसाठी लढले. आज त्यांच्या दुसऱ्या स्मृति दिनी कष्टकऱ्यांना जगवण्यासाठी मदतीचा हात पुढे करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल.” असे उदगार आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. अभिजित वैद्य यांनी काढले.
आरोग्य सेनेतर्फे लोकनेते भाई वैद्य यांच्या दुसऱ्या स्मृति दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता समितीस कष्टकऱ्यांच्या शिध्यासाठी .२५ हजार रुपयांची देणगीचा धनादेश देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. हा धनादेश राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने नितिन पवार, हनुमंत बहिरट, गोरख मेंगाडे, वाघमारे यांनी स्विकारला.
हा धनादेश स्विकारताना नितीन पवार म्हणाले, ‘ आरोग्य सेना नेहमीच गरीबांच्या मदतीला धावून आली आहे. आज लोकनेते भाई यांची स्मृति आरोग्य सैनिकांनी एका वेगळ्या अर्थाने जागवली.’ डॉ. बाबा आढाव यांनी दूरध्वनी वरून भाई वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण केली. आरोग्य सेना आणि हमाल पंचायत यांच्या वतीने हनुमंत बहिरट यांनी सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम आरोग्य सेना राष्ट्रीय मुख्यालय येथे झाला.