मुंबई – आमच्यावर कुणी राजकारण लादले नाही. माझी राजकारणातील सुरुवात आदित्यसारखीच होत होती. मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर, जनतेवर लादणार नाही. पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणारही नाही.
जर तुला जनतेने स्वीकारले तर तू तुझ्या वाटेने पुढे जा. आता आदित्य त्याच्या वाटेने पुढे जातोय. लोकांना पटले तर ते त्याला स्वीकारतील,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली.
राज्याच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत.
दुसरीकडे गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरली. या दोन्ही राज्यात शिवसेनेची पुरेशी ताकद नसली तरी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा जोरदार प्रचार पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे दिल्ली बघणार आणि तुम्ही महाराष्ट्र असे काही ठरले आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत सविस्तर उत्तर दिले.
दरम्यान,भाजपाबाबत ते म्हणाले की, ते सुधारणार आहेत का? सुरुवातीच्या काळात आमची युती वैचारिक पातळीवर झाली होती. पण आता वैचारिक पातळी पाताळात गेलीय का तेच कळत नाही. कुणाबरोबरही युती करायची याबाबत त्यांचाच कित्ता आम्ही गिरवला, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. तसेच कुणी कुणाला बांधील नसते. आपण कुणासोबत आघाडीत असलो, आणि तो चुकत असला तर जे देशाच्या आणि राज्याच्या हिताचे असेल ते मला करणे भाग आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.