पुणे – राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा सुरु होऊन महिना होत आला आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिवसेंदिवसे काहींना काही वाढ होत चालली असून आता सद्यस्थितीला एकूण उपस्थिती 19 टक्के एवढी आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा आठ महिने बंदच होत्या. 15 जूनपासून शासनाच्या आदेशाप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले. त्यानंतर टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला असून त्यासाठी मार्गदर्शन सूचनाही जारी केलेल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांचे संमतीपत्र सादर करण्याचे बंधन घातल्याने सुरुवातीला शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती खूपच कमी होती.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत राज्यातील शाळा व त्यातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत एकत्र अहवाल तयार करण्यात आलेला आहे. राज्यात नववी ते बारावीच्या 22 हजार 204 शाळा असून यातील विद्यार्थ्यांची संख्या 56 लाख 48 हजार 28 एवढी आहे.
23 नोव्हेंबरला 9 हजार 127 शाळा सुरु झाल्या होत्या. त्यातील 2 लाख 99 हजार 193 विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती लावली होती. 2 डिसेंबर रोजी 11 हजार 322 शाळा सुरु झाल्या होत्या व त्यात 4 लाख 91 हजार 962 विद्यार्थी हजर होते.
9 डिसेंबर रोजीच्या अहवालानुसार 11 हजार 410 शाळांमध्ये 6 लाख 4 हजार 884 विद्यार्थी उपस्थित होते. 14 डिसेंबर रोजी 16 हजार 620 शाळांमध्ये 10 लाख 72 हजार 490 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. आता 70.3 टक्के शाळा सुरु झालेल्या आहेत.
राज्यात कोल्हापूर जिल्ह्यामधील शाळामध्ये सर्वाधिक 64.7 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे आढळून आले आहे. मुंबई, ठाणे, नाशिक या भागात अद्याप एकही शाळा सुरु झालेली नाही.
पुणे जिल्ह्यातील 2 हजार 68 शाळा आहेत. त्यात 12 लाख 3 हजार 128 विद्यार्थी आहेत. आता सद्यस्थितीत 721 शाळा सुरु झाल्या असून 48 हजार 453 विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित असल्याचे आढळून आले आहे. या ठिकाणच्या 34.9 टक्के शाळा सुरु झाल्या असून 4 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.