मुंबई, दि. 25 -17 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला आहे. आता पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार, 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे. हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबरमध्ये होणार आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आज अखेरच्या दिवशी औरंगाबाद, उस्मनाबाद जिल्ह्याच्या नामांतरासह नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. या आधी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर शिंदे-भाजप सरकारने हा प्रस्ताव अवैध ठरवत नव्याने त्याला मंजुरी दिली. त्यानंतर आता नामांतराच्या प्रस्तावाला पावसाळी अधिवेशनात विधानसभेत मान्यता देण्यात आली. या दोन शहरांसोबत नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील विमानतळ असे नामांतर करण्याच्या ठरावालाही मंजुरी देण्यात आली
उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत आहे. 1988मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची घोषणा केली होती. 1995ला औरंगाबाद महापालिकेने हा ठराव घेतला होता. तत्कालीन मंत्रिमंडळाने अधिसूचनाही काढली होती. मात्र हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि नामांतर विरोधात निकाल लागला होता.
अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांची फसवणूक
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार पात्र असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांकडून सक्तीने आणि फसवून सबसीडी सोडून देण्याचे अर्ज भरुन घेण्याचे काम अनेक रेशन दुकानातून सुरु आहे. त्यामुळे अनेक गरजू, गरीब लाभार्थी अंत्योदय योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करत हे प्रकार थांबविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात पॉंईंट ऑफ ऑर्डर अंतर्गत केली. ही बाब गंभीर असल्याचे मान्य करत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत चौकशी करुन ते थांबविण्याचे आदेश दिले.