नगर – शिवभोजन योजनेअंतर्गत नगर शहरात नवीन पाच केंद्रे सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रत्येक केंद्रावर प्रत्येकी शंभर थाळ्या देण्यात येणार असून, त्याची सुरुवात एक मार्चपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा विभागातून याबाबत माहिती देण्यात आली.
दरम्यान, 26 जानेवारीला सुरू झालेल्या पाच केंद्रांपैकी कष्टाची भाकर केंद्र येथील थाळ्यांची संख्या शंभरने व कृष्णा भोजनालय व अन्नछत्र येथील थाळ्यांची संख्या प्रत्येकी पन्नासने वाढवण्यात यावी, असा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असून, या केंद्रावर वाढीव थाळ्या देण्यास सुरुवात झाली आहे.
राज्य सरकारने शिवभोजन योजना सुरू केल्यानंतर नगर शहरात 26 जानेवारीला पाच केंद्रे सुरू करण्यात आली. शिवभोजन योजनेला वाढता प्रतिसाद पाहता नव्याने पाच केंद्राना मान्यता मिळावी, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठवला होता. तो मान्य झाला असून, नवीन पाच केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या केंद्रचालकांना या योजनेविषयी माहिती देण्यासाठी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली आहे; तसेच या केंद्रांवर एक मार्चपासून शिवभोजन योजनेअंतर्गत थाळी देण्याचे नियोजन करण्यात आले असून, केंद्रचालकांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवीन पाच केंद्रे सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली असून, तेथे एक मार्चपासून थाळी देण्याचे नियोजन केले आहे. पूर्वी सुरू झालेल्या केंद्रांपैकी काही केंद्रांवर थाळ्यांची संख्या वाढवून देण्यात आली आहे.