नेवासा – भानसहिवरे (ता.नेवासा) येथील विश्वनाथ बळदेव चव्हाण या ग्रामिण भागातील शेतकऱ्याने तब्बल दहा वर्ष अथक परिश्रम घेवून ऊस पिकाचे ‘को – ज्ञानेश्वर’ या ऊस वाणाची निर्मीती करुन केंद्र सरकारची अधिकृत मान्यता मिळविली आहे. ग्रामिण भागातील शेतकरी चव्हाण यांनी को – ज्ञानेश्वर हे पिक वाण निर्माण करुन शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे तालुक्यातून मोठे स्वागत केले जात आहे.
प्रयोगशिल शेतकरी व संशोधक विश्वनाथ चव्हाण यांनी सन २०१४ मध्ये या ऊस वाणाचे संशोधन करुन केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या विभागाकडे सादर केले होते. त्यामुळे या ऊस वाणास पडताळणी करुन संबंधित विभागाने या को – ज्ञानेश्वर या पिक वाणास परवानगी दिली आहे. उस हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पिक म्हणून ओळखले जात आहे.
एकेकाळी साखर आयात करणारा आपला देश आता साखरेची निर्यातही करू लागलेला महाराष्ट्रात शेकडोंच्यावर साखर कारखान्यांची नोंदणी झालेली असून खाजगी कारखान्यांसह सहकारी साखर कारखाने देखील राज्यात कार्यान्वित आहेत. ऊस पिक हे शेतकऱ्यांसाठी नगदी पिक म्हणून ओळखले जात असल्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा अधिक ओढा आहे.
ऊसवाण संशोधक चव्हाण यांनी दैनिक प्रभात’शी संवाद साधतांना ते म्हणाले की, ऊसाची लागवड करत असतांना शेतकऱ्यांनी जास्त साखर उत्पादन होणाऱ्या तसेच जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या ऊस जातीची निवड करणे गरजेचे आहे. सुधारित ऊस वाणाची निवड करत असताना जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता, भौगोलिक परिस्थिती, जमिनीचा सामू हे मुद्दे लक्षात घेऊन निवड करावी. को – ज्ञानेश्वर पिक वाण हे ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची अर्थिक चक्रे वेगाने फिरविणार असल्याचा आशावादही यावेळी बोलतांना व्यक्त केला आहे.
भानसहिवरे या एका खेडेगांवच्या विश्वनाथ चव्हाण या शेतकऱ्याने को – ज्ञानेश्वर ऊस पिकाचे संशोधन करुन केंद्र सरकारची अधिकृत मान्यता मिळविलेली आहे ही एक अभिमानाची बाब असून जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात मानाचा तुरा रोवला असल्याचे जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे पाटील यांनी म्हंटले. यावेळी संशोधक चव्हाण यांचा गावाच्या वतीने सत्कार केला. अनेक मान्यवरांनी सुभेच्छा देत अभिनंदही केले आहे. याप्रसंगी प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष मानव साळवे, सचिव आरिफ शेख, खजिनदार चांगदेव दारूंटे, आस्लम सय्यद, रावसाहेब भणगे, राहुल वंजारे, बाळासाहेब शेंडे, रघुनाथ काळे, भाऊसाहेब काळे, शाहुल मकासरे, अन्सार आतार, शिवाजी भणगे, यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.