Saamana Editorial on Narendra Modi| राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोंदींना कुटुंब नाही, ते हिंदू नाहीत, अशी टीका केली होती. या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १४० कोटी जनता हाच माझा परिवार, असे म्हणत प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर भाजपकडून सोशल मीडियावर ‘मोदी परिवार’ अशी मोहीम सुरू करण्यात आली. यावरून ठाकरे गटाच्या सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. “‘मोदी परिवार’ हा मोदींनीच फुगविलेला फुगा आहे आणि जनताच उद्या तो फोडणार आहे” अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.
काय लिहिले सामना अग्रलेखात ? Saamana Editorial on Narendra Modi|
“देश म्हणजेच कुटुंब वगैरे फक्त तोंडी लावण्यापुरते आहे. प्रत्यक्षात तुमचे कुटुंब म्हणजे तुमचे उद्योगपती मित्र, तुमच्या सभोवती असलेले कोंडाळे हेच आहे. सोशल मीडियावरून तुमचा उदो उदो करणाऱ्या सायबर टोळया हे तुमचे कुटुंब आहे. ‘मोदी मोदी’च्या नशेत तल्लीन ‘भगतगण’ म्हणजे तुमचा परिवार आहे. लोकशाहीमध्ये विरोधक, टीकाकार हेदेखील सत्ताधारी पक्षाने कौटुंबिक सदस्यच समजायचे असतात. मोदी राजवटीत हे चित्र कधीच दिसले नाही.”
विरोधी पक्ष फोडणारे आज देशाला त्यांचे कुटुंब म्हणतात तेव्हा धक्काच बसतो. स्वागताच्या हारामध्येही ज्यांना कोणी दुसरा नेता आलेला चालत नाही ते पंतप्रधान मोदी जेव्हा ‘मेरा देश, मेरा परिवार’ असा आव आणतात, तेव्हा हसायचे की डोक्यावर हात मारून घ्यायचा, हा प्रश्न पडतो. विरोधी पक्षांतील परिवार वादावर तोंड फाटेपर्यंत बोलणाऱ्या पंतप्रधानांना दुसऱ्या पक्षांमधील ‘कुटुंबशाही’ आपल्या राजकीय स्वार्थासाठी ‘भाजप परिवारा’त आलेली चालते, मात्र दहा वर्षांच्या मोदी राजवटीनंतरही विस्थापितच राहिलेले कश्मिरी पंडित या परिवाराचे सदस्य आजही होऊ शकलेले नसल्याचे देखील यात म्हंटले आहे.
मोदींनीच फुगविलेला फुगा जनताच उद्या फोडणार Saamana Editorial on Narendra Modi|
“रक्तरंजित मणिपूरही ‘मोदी का परिवार’मध्ये येत नाही. मोदी सांगत असलेल्या त्यांच्या कुटुंबाचे खरे रूप हे असे आहे. ‘मेरा देश मेरा परिवार’ हा फक्त त्यावर दिलेला मुलामा आहे. ज्या 140 कोटी जनतेला पंतप्रधान मोदी त्यांचे कुटुंबीय म्हणतात तिलाही हा मुलामा आणि आतला खरा चेहरा आता लक्षात आला आहे. ‘मोदी परिवार’ हा मोदींनीच फुगविलेला फुगा आहे आणि जनताच उद्या तो फोडणार आहे,” असा इशाराही यातून देण्यात आला आहे.
यात उद्धव ठाकरे यांच्याबाबत देखील भाष्य केले. “कोरोनासारख्या भयंकर काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेमळ कुटुंब प्रमुखाप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेची काळजी घेतली. त्यामुळेच कोरोनाकाळातील कुटुंबवत्सल उद्धव ठाकरे आजही जनतेच्या मनात कायम आहेत. हीच सल ‘मेरा देश, मेरा परिवार’ म्हणणाऱ्यांच्या मनात होती आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडले. शिवसेनेतील गद्दारांना मांडीवर घेतले आणि शिवसेनेत फूट पाडली,” अशी घणाघाती टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.