सातारा, (प्रतिनिधी)- शहराच्या प्रमुख रस्त्यांवर होणार्या अतिक्रमणांकडे पालिका प्रशासन डोळेझाक करत आहेच, त्याचबरोबर शहराच्या इतर भागात आणि गल्लीबोळांमध्ये होणार्या अतिक्रमणांकडेही दुर्लक्ष केले जात आहे.
मंगळवार पेठेतील समर्थ मंदिर ते धस कॉलनी रस्त्यावर तारळेकर गिरणीसमोर ‘श्री दत्त साई’ या बंगल्याच्या कम्पाऊंड वॉलच्या बाहेर रस्त्यावर एकाने अतिक्रमण केले आहे. तर तेथून जवळच असलेल्या पिंपळेश्वर-वाकडेश्वर मंदिरासमोर एकाने घराभोवती चक्क रस्त्यावरच संरक्षक जाळी ठोकली आहे.
शहरातील जवळपास सर्वच भागात अतिक्रमणे बोकाळली आहेत. मुख्य रस्त्यांवर अनधिकृत विक्रेते पथारी टाकून बसत आहेत. राजपथावरील फुटपाथ तर पालिकेने अनधिकृत विक्रेत्यांना आंदण दिल्यासारखेच आहेत. अनेक दुकानदारांनी तर दुरुस्तीच्या नावाखाली आपल्या दुकानांचा कायापालट केला आहे. मात्र, त्याच्याशी आपले काहीही देणेघेणे नसल्याची पालिका प्रशासनाची वर्तणूक आहे.
पालिकेच्या दुर्लक्षामुळे आता इतर भागात आणि गल्लीबोळांमध्येही अतिक्रमणे बोकाळू लागली आहेत. समर्थ मंदिर ते धस कॉलनी या रस्त्यावर एकाने बंगल्याच्या कम्पाऊंड वॉलच्या बाहेर अतिक्रमण करून, नवी भिंत बांधली आहे. पालिकेच्या रस्त्याचा भाग गिळंकृत करायचा संबंधिताचा डाव असल्याची चर्चा परिसरात आहे.
बंगल्याची मूळ संरक्षक भिंत आणि नवीन बांधलेल्या भिंतीच्या जागेत संबंधित नागरिक ‘गार्डन’ करणार असल्याचीही चर्चा आहे. संबंधित व्यक्तीकडे पालिकेच्या अनेक कामांचे ठेके असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. कदाचित पालिकेचा ठेकेदार असल्याने प्रशासनाने त्याला अतिक्रमण करायची मुभा दिली असावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या बंगल्याचे आवार मुख्य रस्त्यापासून पिंपळेश्वर- वाकडेश्वर मंदिराकडे येणार्या बोळापर्यंत आहे. बंगल्याच्या तिन्ही बाजूंना भिंती घालून, अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याचबरोबर बंगल्याच्या गेटच्या बाहेर रस्त्यावरून, मोठे वाहन आवारात आणण्यासाठी रॅम्प करण्यात आला आहे.
या अतिक्रमणाकडे प्रभागातील माजी नगरसेवकाचेही दुर्लक्ष झाले आहे, अशी चर्चा आहे. पिंपळेश्वर-वाकडेश्वर मंदिराकडे येणार्या बोळातही आणखी एकाने स्वत:च्या घराभोवती संरक्षक जाळी उभारली आहे. ही जाळी चक्क पालिकेच्या रस्त्यात ठोकण्यात आली आहे. या अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाने कारवाई करून संबंधितांना जबर दंड करावा, अशी मागणी होत आहे.