पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना तिकीट देत भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोन्ही उमेदवारांत ही सरळ लढत होईल, अशी चिन्हे होती. त्यात आता वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता ही लढत तिरंगी होणार आहे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभेत अनेकांच्या विजयला सुरूंग लावणारी वंचित बहुजन आघाडी यावेळी कोणाला धक्का देणार, याबाबत राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. वसंत मोरे हे आक्रमक भूमिकेमुळे मनसेचे “डॅशिंग’ उमेदवार म्हणून ओळखले जात होते. त्यांनी या पूर्वी हडपसर मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढविली आहे. अनुभवी असलेल्या यावेळीही मोरेंनी मते खेचल्यास त्याचा फटका मोहोळ किंवा धंगेकरांना बसणार आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या(तेव्हाची भारिप बहुजन महासंघ) उमेदवाराला दोन हजार मतेही मिळालेली नव्हती. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचितने मुसंडी मारली. पुण्यात सहा विधानसभा मतदारसंघातील कसबावगळता इतर पाच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार देण्यात आले. त्यात ४ ठिकाणी वंचितला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. या निवडणुकीत वंचितला शहरातून ५० हजारांवर मतदान झाले.
भाजप, काॅंग्रेसला प्रत्येकी दोन ठिकाणी धक्का
वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना पाच हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव पत्कारावा लागला. वडगावशेरीत वंचितच्या उमेदवाराला १० हजार मते होती, तर हडपसरमध्ये साडेसात हजार मते होती.
विशेष म्हणजे त्यावेळी मनसेकडून वसंत मोरे निवडणूक रिंग़णात होते. त्यांनाही ३९ हजार मते मिळाली होती. कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघात काॅग्रेसच्या उमेदवारांचाही पाच हजारांपेक्षा कमी फरकाने पराभव झाला. या दोन्ही ठिकाणी वंचितच्या उमेदवारांना जवळपास दहा हजार मते मिळाली.
तर पर्वती आणि कोथरूडमध्येही वंचितला दोन्ही मिळून दहा हजार मते मिळाली. या दोन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत वंचितच्या उमेदवाराला तब्बल ६२ हजार मते मिळाली. त्यामुळे वंचितने पुन्हा एकदा पुण्यात उमेदवार उतरविवला असून त्यांची आणि मोरेंची मते एकत्रित झाल्यास त्याचा फटका नक्की कोणाला बसणार? याबाबत राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
मनसेची भूमिका निर्णयाक ठरणार
लोकसभेसाठी मनसे पुण्याच्या मैदानात उतरणार नसली, तरी त्यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. धंगेकर आणि मोरे हे दोन्ही मनसेच्या स्थापनेपासून पक्षात होते. मात्र, धंगेकरांनी २०१७ मध्ये मनसेला रामराम केला, तर मोरे यांनी महिनाभरापूर्वी “जय महाराष्ट्र’केला आहे, या दोन्ही नेत्यांचा मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चांगले संबध आहेत. त्यातच आता मनसे महायुतीचा प्रचार करणार असल्याने मनसेची भूमिकाही लोकसभा उमेदवाराच्या विजयात निर्णायक ठरणार आहे.