हर्षद कटारिया बिबवेवाडी, दि. 9 -“स्वच्छ भारत अभियान’ यशस्वी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थिती विदारक आहे. फक्त पर्वती मतदारसंघात 39 झोपडपट्ट्या असून यातील व सार्वजनिक रस्त्यांवरील सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या शेकडोच्या घरात आहे. प्रचंड दुर्गंधी, अस्वच्छता, गळके नळ, तुटलेले दरवाजे, भिंतीवर चिकटवण्यात आलेल्या असल्या-तसल्या जाहिराती, रस्त्यावर वाहणारे पाणी अशी स्थिती शहरातील सर्वच सार्वजनिक स्वच्छतागृहांची आहे. महापालिकेकडून स्वच्छतेच्या नावाखाली होणारा खर्च मात्र मोठा आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांची अशी अवस्था असण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत असताना “स्वच्छ पुणे-सुंदर पुणे’चे स्वप्न अस्तित्वात येण्यासाठी महापालिका प्रशासनासह स्थानिक नगरसेवकांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
शहर तसेच उपनगरांत अनेक सार्वजनिक स्वच्छतागृह असली तरी याचा वापर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा बेघर तसेच फिरस्ते, अशा घटकांकडूनच अधिक प्रमाणात होत असतो. बहुतांशी नागरिक सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करणे टाळतात, अशा ठिकाणी अस्वच्छताच असते, हेच यामागील कारण सांगितले जाते.
शहर स्वच्छ राहण्यासाठी अशा सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी गरज असते, परंतु, त्यांच्या देखभाल आणि स्वच्छतेकडेच पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असते, अशा ठिकाणच्या स्वच्छतेतूनच अनेक आजारांना सुद्धा आमंत्रण मिळत असते, अस्वच्छ असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करू नये, असे आरोग्य तज्ज्ञही सांगतात. विशेष म्हणजे शहरात महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांची संख्या कमीच आहे, यातून महिलांची कुचंबना होत असताना महिलांचे आजार बळावण्यामागे हे कारणही सांगितले जाते. त्यामुळे शहर तसेच उपनगरांतील सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. याकरिता प्रशासकीय उदासीनता झटकण्याची गरज आहे.
अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे टीबी, डायरिया सारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये घाण पाणी साचून राहिल्यास डासांचे प्रमाण वाढते. यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पसरतात. युरिन इन्फेक्शन होण्याचे प्रमाणही अधिक आहे. स्वच्छतागृह स्वच्छ ठेवल्यास संक्रमीत आजारांचे प्रमाणही कमी होत असते. याबाबीकडे पालिका प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
– डॉ. शाम आळे-पाटील, निरामय क्लिनिक, पुणे
सार्वजनिक शौचालय स्वच्छ ठेवण्याचे काम कंत्राटी पद्धतीने खासगी कंपनीला देण्याबाबत महापालिकेची प्रक्रिया सुरू आहे. स्वच्छतागृह स्वच्छ राखण्यासाठी तेथे मुबलक पाणी असणे तसेच ड्रेनेजलाइन चांगली असणे गरजेचे आहे. संबंधित ठेकेदार दोन वेळा स्वच्छता करतात. मात्र, पाणी नसेल किंवा ड्रेनेजची समस्या असेल तर दुर्गंधी पसरते.
– विक्रम काथवडे, प्रमुख आरोग्य निरीक्षक,
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय