पुणे – “जगभरातील बहुतांश प्रश्नांची उत्तरे भारत देईल, ही आशा जगाला आहे. पण, भारतीयांना याची जाणीव आहे का, हा प्रश्न आहे. आता गुलामी नसली तरी गुलामगिरीची वृत्ती अजून आहे. राष्ट्रजागृतीचे कार्य सध्या देशात सुरू आहे. ते राष्ट्रव्यापी झाले आहे. मात्र भारतात बुद्धिजीवी क्षत्रियांची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी त्यासाठी तयार राहायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
धुळे येथील “श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर’ यांच्या वतीने समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या संपादित आवृत्तीच्या आठ खंडांचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी फुलगाव येथील श्रृतीसागर आश्रमाचे संस्थापक स्वामी स्वरुपानंद सरस्वती, संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतसंघचालक नानासाहेब जाधव, सज्जनगड संस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त बाळासाहेब स्वामी आणि मंदिराचे अध्यक्ष अनंत चितळे यावेळी उपस्थित होते.
“श्रीराम’ हा शब्द चेतना निर्माण करणारा आहे. कोणतीही जात, पंथ असो आयुष्य उत्तुंग करायचे असल्यास आचार-विचार कसे असावेत, हे श्रीरामाच्या ग्रंथात लिहिले आहे. माणूस घडवायचा असेल, तर राम हा जीवनाचा आदर्श मानला पाहिजे, असे स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले. या प्रकल्पाचे प्रमुख शरद कुबेर यांनी ग्रंथाची माहिती दिली. देवेंद्र डोंगरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अरविंद जोशी यांनी सूत्रसंचालन केले, विनय खटावकर यांनी आभार मानले.