पुणे – पुणे शहरात सुरू असलेल्या “राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या अखिल भारतीय समन्वय बैठकीच्या निमित्ताने “शिवचरित्राची ओळख’ करून देणारी तसेच “स्वातंत्र्य संग्रामातील जनजाती नायकांचे योगदान’ या दोन विषयावरील प्रदर्शनी बैठकस्थळी प्रदर्शित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष असल्याने ही प्रदर्शनी लावण्यात आली आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि बैठकीसाठी आलेल्या सर्व प्रतिनिधींनी ही प्रदर्शनी पाहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळाही येथे ठेवण्यात आला आहे. त्यांच्या एका हातात राजदंड तर दुसऱ्या हातात तलवार आहे. महाराजांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग, इतिहासकार विजयराव देशमुख, वा. सी. बेंद्रे आदींनी केलेले शिवरायांचे वर्णन, शिवकालीन पत्रांचे दाखले, कवी भूषण यांचे काव्य तसेच शिवरायांवरील पोवाडे, महाराजांनी उभारलेले आरमार, त्यांनी लिहिलेल्या पत्रांचे अनुवाद तसेच हिंदवी स्वराज्यातील गडकोट, “शिवभारता’ तील काही वर्णने, महाराजांचे “आज्ञापत्र’ अशी माहिती या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा इतिहास दर्शवणारे “भक्ती शक्ती संगम’ हे शिल्पही या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.
“स्वातंत्र्य संग्रामातील जनजाती नायकांचे योगदान’ या विषयावरील प्रदर्शनी “अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेने तयार केली आहे. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या जनजाती समाजाने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यांचे बलिदान याची माहिती या प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे.
विविध संघटनांनी एकत्र येऊन प्रारंभ केलेल्या “स्वावलंबी भारत अभियान’ या विषयावरील प्रदर्शनी बैठकस्थानी मांडण्यात आली आहे. बेरोजगारी, गरिबी मुक्त आणि समृद्धी युक्त, स्वावलंबी भारताची निर्मिती हे या अभियानाचे लक्ष्य आहे. या अभियाना अंतर्गत आर्थिक, सामजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या संस्थांचा सहभाग असून, त्यांच्याकडून देशभर सुरू असलेल्या कार्याची माहिती या प्रदर्शनीद्वारे मांडण्यात आली आहे. यशस्वी नवउद्यमींच्या कथा या प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगण्यात आल्या आहेत.