अरुण गोखले
मानवी मन हे फार विलक्षण आहे. त्याचा थांगपत्ता हा मी मी म्हणणाऱ्यांनाही लागत नाही. ते चंचल आहे तसेच ते जिथे रमते तिथे ते गुंतून पडते. हा त्याचा स्थायी स्वभाव आहे. संत कबिरांनी हाच मानवी मनाच्या गुंत्याचा बारकाईने विचार केला. मगच त्यांनी बहुमोल सल्ला दिला की, गुंतणे हा जर मानवी मनाचा स्वभाव, त्याचा गुणधर्मच आहे. तर त्या मनाला नेमकं कुठे आणि कशात गुंतवायचे याचा विचार मात्र तू कर.
संत कबिरांचा “यहॉंसे उखाडना और यहॉं लगाना’ हा जो उपदेश आहे तो यासाठीच. स्वानुभवाच्या ताकदीवर ते म्हणतात की, मी तो विचार केला. तशी कृती केली आणि मी खरा सुखी, समाधानी आणि स्वानंदी झालो. मानवी मन हे धनाशी गुंतते, प्रेमात अडकते. एकदा का एखाद्याला प्रेमाने आपले म्हटले की, त्याच्यावर प्रसंगी जीवही ओवाळून टाकते.
हे सारे मनानीच केले जाते, कारण तो त्याचा स्वभाव आहे. मी त्याला प्रपंचाच्या क्षणिक सुखात न गुंतवता परमार्थाच्या राम भजनाच्या अक्षय सुखात गुंतवले. मी स्वार्थी, लोभी, नाटकी लोकांची जवळीक न साधता विवेक विचाराने माझ्या मनास जन्मोजन्मी साथ देणाऱ्या माझ्या खऱ्या सख्या आणि सोयऱ्या श्रीरामाशी जोडले. त्याला व्यावहारिक लाभ हानीचे छंद न लावता त्यास चिरंतन सुख देणाऱ्या भक्तीची गोडी लावली.
मी तुमच्या सारखाच संसार प्रापंचिक असूनही मी माझ्या मनास बोधाचे तेल लावून त्या भवसागरात वावरतो आहे. मला इथले वृत्तीचे मासे चावत नाहीत. मी पाण्यात असूनही पाण्याचा स्पर्श नसणाऱ्या कमलपत्रासारखा त्यात असूनही त्यापेक्षा वेगळा आहे.
कारण माझं मन. मी माझ्या मनास त्याच्या खऱ्या हितकारी मार्गाशी जोडले आहे. त्याला रामनामाच्या स्वानंद सुखात गुंतवले आहे. आता ते तिथे इतके गुंतले आहे की, तिथून त्यास बाहेरच पडावेसे वाटत नाही.
म्हणूनच आधी केले मग सांगितले, हा असा माझा बोध ध्यानी धरा. मनाची गुंती लक्षात घ्या आणि त्याला योग्य आणि कल्याणकारी जागीच गुंतवा. ही सोडवणूक तुमची तुम्हीच करायची आहे. त्यासाठी इतरांची नाही, तर तुम्ही तुमच्याच मनाची मदत घ्या. कारण मनानेच सर्व काही साधायचे आणि नेमकेपणाने जोडायचे असते हे विसरू नका.