अरुण गोखले
ईश्वर उपासना करायची, देवाची भक्ती करायची तर त्यासाठी आपल्या मनाचे अनुसंधान हे साधायला हवे. ते तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य संसारी माणसांना कसं साधणार? हा आपल्या मनातला प्रश्न जेव्हा साधकांनी विचारला, तेव्हा उत्तर देताना सद्गुरू म्हणाले, “खरं म्हणजे हे अनुसंधान तुम्हा-आम्हाला सतत लागलेले असतेच.
आता तुम्ही म्हणाल की ते कसे काय? आम्ही तर हे परमार्थातले त्यासाठी कोणता खास असा अभ्यास केलेला नाही. होय ना? त्याचं काय आहे, आपण हे अनुसंधान म्हणजे काय असते ते सतत अनुभवत असतो पण हेच ते अनुसंधान हे आपल्याला कळत नसते. असे पाहा की, आपल्याला गावाला जायचे असते किंवा कोणी आपल्याकडे गावाहून येणार असते. आपल्याला कधी जायचे आहे, गाडी कोणती, वेळ कोणती, जागा कोणती हे ठरलेले किंवा नियोजित केलेले असते.
तरी आपण आपली इतर सर्व कामे, व्यवहार करीत असताना सतत मनात एकसारखा त्याच गोष्टीचा विचार करत असतो. आपण शरीराने जरी इथे असलो तरी आपले मन हे मात्र तिकडेच लागलेले असते. त्या गोष्टीचाच विचार आपल्या मनात येत असतो.
असा विचार चालू असताना इकडचे सर्व लौकिक व्यवहार हे आपण बिनचूक करत असतो. लेक गावावरून माहेरी येणार म्हणून तिचा विचार करताना भाकरी करपत नाही, भाजीत जादा मीठ तिखट पडत नाही. उद्या ट्रीपला जायचे असते म्हणून आज आपण आपली कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावलेलाच असतो. आपण गाडी चालवत असतो, बोलत असतो, गप्पागोष्टी करीत असतो.
पण मनात मात्र गावी जाण्याचा, कोणाच्या तरी येण्याचा विचार आपण करतच असतो. हा तुमचा आमचा सर्वांचाच अनुभव आहे. खरं ना? मग परमार्थ साधण्यासाठी आपल्याला तेच करायचे आहे. आपण आपले सर्व व्यवहार करीत असताना ते देवाच्या साक्षीने, त्याचे स्मरण ठेवून, त्याला स्मरून, त्याला साक्षी ठेवून करायचे असतात. तसे केले की आपले त्याच्याशी आपोआप अनुुसंधान जोडले जाते.
कामाला नामाची जोड दिली की संसार हाच परमार्थ होतो. असा संसार आपल्या संतांनी केला. त्यांनी आधी केले मग सांगितले म्हणूनच त्यांच्या सांगण्याला प्रचितीचे बोल असे म्हणतात. त्यांनी संसार प्रपंच्याचा त्याग केला नाही तर त्यांनी त्याच्याकडे परमार्थ म्हणून पाहिले.