अकोला – राज्यात गेल्या वर्षी करोना काळात झालेल्या लॉकडाऊनमध्ये वीज कंपन्यांकडून लोकांना वीज बिलं वाढवून देण्यात आली होती. वाढीव वीज बिलं माफ करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर वीज बिलात सवलत देण्यात येईल, अशी घोषणाही करण्यात आली. मात्र राज्य सरकार वीज बिल सवलत देण्यावरून मागे हटले आहे. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावरच हल्लबोल केला. काही तरी लेणदेण झाल्यामुळेच वीजबिल माफी मागे घेतल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादीकडून आज प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची गरज आहे. त्यामुळे ते राज्यातील वीज बिलाच्या प्रश्नावर बेछुट आरोप करत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद मेळाव्यात रविवारी बोलत होते.
वीज बिलाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर आहे. मात्र एवढ्या महत्वाच्या विषयावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी अदानी आले अन् वीज बिलाचा प्रश्न मागे पडला असे विधान करणे हस्यास्पद असल्याचे पाटील म्हणाले. सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची नितांत गरज आहे. त्यामुळेच त्यांनी असे विधान केल्याचे पाटील म्हणाले.
राज्यात वीज बिल माफ करणार नाही हा निर्णय कंपन्यांसोबत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेणदेणं झाल्याशिवाय हे झालं नसेल, असा आरोप राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्य शरद पवारांवर केला होता. तसेच सगळ्या कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.