पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची आज जयंती. 7 फेब्रुवारी 1898 मध्ये वंदनगाव येथे त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्या काळात बालविवाहाची प्रथा असल्याने वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने बाबासाहेबांसोबत पार पडला. वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बाबासाहेबांच्या पाठीशी त्या आजन्म खंबीरपणे उभ्या राहिल्या.
बाबासाहेबांची प्रेरणा, स्फुर्ती आणि लढण्याची उर्मी रमाईंचा त्यागच होता. ज्यावेळी बाबासाहेब अस्पृश्यांच्या न्यायासाठी दिवस-रात्र एक करून लढत होते. त्यावेळी रमाईने कोणतीही तक्रार न करता अत्यंत कष्टाने संसाराचा गाडा एकटीने हाकत बाबासाहेबांना नेहमी प्रोत्साहन दिले.
ज्यावेळी बाबासाहेब लंडनला शिकत होते त्यावेळी त्यांची परिस्थिती फारच बिकट होती. बाबासाहेब ब्रेडच्या तुकड्यावर आपले पोट भरत तर कधी फक्त पाण्यावर त्यांना दिवस ढकलावे लागत होते. माता रमाईला बाबासाहेबांच्या या परिस्थितीबाबत पत्रातून समजताच रमाईचा जीव कासावीस झाला. आपण काहीतरी करून बाबासाहेबांना पैसे पाठवायला हवेत असे रमाईने ठरवले. पण पैसे कमावणार कसे हा प्रश्न देखील होताच.
आपल्या स्वाभिमानी पतीला कोणाकडून पैसे मागितलेले आवडणार नाहीच पण ते आपल्या स्वतःलाही पटणार नाही. एव्हढेच काय तर दिवसाढवळ्या काही काम केले तर साहेबांची इज्जत जाईल या विचाराने रमाई पुरत्या गोंधळून गेल्या. पण काहीही करून पैसे कमवायचे आणि बाबासाहेबांना हातभार लावायचा यावर त्या ठाम होत्या. त्यावर तोडगा म्हणून त्या सकाळी भल्या पहाटे ४ वाजता उठून शेण्या-गोवर्या करून दिवस उजडण्यापूर्वी त्या विकत. त्यातून तुटपुंजे पैसे यायचे. रमाई त्यातून दोन भाकर्या बनवायची. आत्याबाई, जाऊबाई आणि मुलांसाठी दोन-चार भाकर्या बनवायच्या. त्यातून पैसे राखून ठेवायच्या . ते जमवलेले पैसे त्या लंडनला पाठवू लागल्या.
माता रमाईच्या त्याग आणि बलिदानामुळे बाबासाहेबांना यश मिळत गेले. रमाईंनी उभ्या आयुष्यात आपल्या पतीकडे कोणताही हट्ट किंवा तक्रार केली नाही. सर्व हालअपेष्टा सहन करत त्यांनी नेहमी आपल्या पतीला भक्कम साथ दिली. अशा या त्यागमूर्तीच्या साथीमुळे बाबासाहेब देखील आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकले. बाबासाहेब आणि रमाईच्या वैयक्तिक जीवनात बरेचसे वाईट प्रसंग आले परंतु त्याचा कोणताही परिणाम त्यांनी आपल्या ध्येयावर होऊ दिला नाही. बाबासाहेब परदेशी असताना अनेक अडचणींचा रमाबाईंना तोंड द्यावे लागले. परंतु एका त्यागमूर्ती प्रमाणे त्यांनी आपल्या पतीपर्यंत त्यांच्या दुःखाची कोणतीच झळ पोहचू दिली नाही. 28 वर्षे रमाईने बाबासाहेबांना साथ दिली.
कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व आपल्या पत्नीमध्ये मिळणे हे बाबासाहेबांचे भाग्यचं. बाबासाहेबांचे सुद्धा रमाबाईवर निस्सीम प्रेम होते. त्यांच्यातील प्रेम, आदर आणि सामंजस्य म्हणजे एक आदर्शचं.
– पियुषा अवचर