कवठे (प्रतिनिधी) – पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोल नाक्याच्या पुढील बाजूस अरुंद पुलावर राष्ट्रवादीचे जावळीतील नेते दीपक पवार यांच्या इनोव्हा कारचा पुढचा टायर फुटल्याने कारने पुलाच्या संरक्षक कठड्याला धडकली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. या भीषण अपघातातून दीपक पवार हे बचावले असून, किरकोळ जखमी झाले आहेत. याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दीपक पवार व सातारचे माजी नगरसेवक सागर पावशे हे इनोव्हा कार (एमएच-11-सीएच-5544) मधून मंगळवारी दुपारी 1.15 च्या सुमारास साताऱ्याकडून पुण्याकडे निघाले होते. आनेवाडी टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या अरुंद पुलावर त्यांच्या कारचा पुढील बाजूचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार पुलाच्या संरक्षक कठड्यावर जोराने आदळली. त्याच वेळी पाठीमागून आलेल्या कारने (एमएच-11-एडब्ल्यू-7162) इनोव्हा कारला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे पवार यांची कार जागेवर फिरून रस्त्यावर आली.
सुमिध भट यांच्या कारची धडक बसली नसती तर पवार यांची कार कठड्यावरून खाली पडून अनर्थ घडला असता; पण नशीब बलवत्तर असल्याने पवार व पावशे हे बचावले. या अपघाताची माहिती मिळताच भुईंजचे पोलीस उपनिरीक्षक भंडारी, हवालदार शंकर घाडगे, टोल नाक्यावर बंदोबस्तासाठी असलेले सतीश पवार, दत्तात्रय भुसारी, खताळ, गोकुळ गोडसे, तुकाराम पवार हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पवार व पावशे यांना कारमधून बाहेर काढून उपचारांसाठी साताऱ्याकडे पाठविले. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त कार बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
ज्या ठिकाणी अपघात झाला, तेथील अरुंद पूल तसाच राहिला आहे. महामार्गाच्या सहापदरीकरणातही या पुलाचे रुंदीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे हा पूल दुपदरीच राहिला आहे. टोल नाक्यावरून पुण्याच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या वाहनांच्या चालकांना या पुलाचा अंदाज न अपघात घडत आहेत. त्यामुळे हा पूल सहापदरी करावा, अशी मागणी होत आहे.