महा”शिव’आघाडीच्या समीकरणाद्वारे सत्ता स्थापन झाल्यास मंत्रिमंडळात जिल्ह्यातील सर्वाधिक चेहरे?
पुणे – देशासह महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस मुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला 2014पासून 2019च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत चांगले यश आले होते. मात्र, त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात शरद पवार नावाचे वादळ घोंगावले आणि राज्यातील सत्तेचे गणितच बदलून गेले.
भाजप-शिवसेने “महायुती’च्या नावाखाली एकत्र निवडणूक लढवत पुन्हा बहुमत मिळवले. मात्र, “पद’ व “जबाबदारी’ (मुख्यमंत्रीपद) या शब्दांच्या खेळामुळे भाजप-शिवसेनेची “युती’ तोडण्यापर्यंतची वेळ येऊन ठेपली. यामुळे राज्यात महा”शिव’आघाडी होण्याचे संकेत मिळत आहे. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेसाठी एकत्र येत कॉंग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते सत्तेच्या या समीकरणामुळे उत्साहित आहेत. राष्ट्रवादी थेट सत्तेत सहभागी होण्याची चिन्हे असल्याने या नवीन मंत्रिमंडळात जिल्ह्यातील सर्वाधिक चेहरे दिसण्याचे शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन रविवारी (दि. 10) तब्बल 18 दिवस उलटूनही कोणीही सत्ता स्थापन केलेली नाही, की राज्यपालांकडे दावाही केलेला नाही. जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत देऊनही केवळ “मुख्यमंत्री’च्या मोहामुळे भाजप-शिवसेनेचे बिनसले अन् राज्यातील जनता, शेतकरी वाऱ्यावर आहेत. सध्या चर्चेत असलेले सत्तासमीकरण (महा”शिव’आघाडी) झाल्यास याचा सर्वाधिक फायदा पुणे जिल्ह्याला होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात असून बारामती केंद्रबिंदू ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. तसे पाहिला गेले तर पुणे शहरातील 8, जिल्ह्यातील 10, पिंपरी-चिंचवडमधील 3 अशा एकूण 21 मतदारसंघात शिवसेनेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. तर जिल्ह्यात कॉंगेस व राष्ट्रवादीचे मातब्बर नेते निवडून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेचा वाटा मिळाला तर जिल्ह्यातील मातब्बरासह नवीन चेहऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात
येत आहे.
या चेहऱ्यांनाही मिळणार का संधी?
राज्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेली लढत होती, ती इंदापूर मतदारसंघातील या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा आमदार दत्तात्रय भरणे व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या लढत होती. तर सलग दुसऱ्यांदा आमदार भरणे यांनी पाटील यांना धूळ चारल्याने व विरोधी आमदार असतानाही मतदारसंघात केलेल्या कामांची पोचपावती म्हणून भरणेंच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडू शकते.
त्यांच्याबरोबरच शिरूर-हवेली मतदारसंघातील आमदार ऍड. अशोक पवार व खेड-आळंदी मतदारसंघातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अनुक्रमे दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा आमदारकी मिळाल्याने त्यांच्या अनुभवामुळे त्यांच्या गळ्यातही कॅबिनेट नाही तर किमान राज्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडू शकते. तर जुन्नर विधानसभेचे आमदार अतुल बेनके, हडसपरमधील चेतन तुपे, मावळमधील सुनील शेळके हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले तरी त्यांच्या कामाचा अनुभव व तरुण चेहऱ्यामुळे तर वडगाव शेरीतील सुनील टिंगरे यांना अनुभवाच्या जोरावर मंत्रीपदाची संधी मिळू शकते.
कॉंग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष – नव्या समीकरणात कॉंग्रेसने बाहेरूनऐवजी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर या सत्तेत भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांना निश्चित मंत्रीपद मिळू शकते. कारण 2014च्या निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेसची चांगलीच धूळधाण झाली होती. त्यात आमदार थोपटे यांनी एकाकी लढात देत आपला गड काबिज केला होता. तर 2019मध्ये निवडून येत त्यांनी हॅट्ट्रिक साधली असल्याने त्यांच्या अनुभवामुळे त्यांना मंत्रीपद मिळू शकते.
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा परभव केल्याने त्यांचेही राजकीय वजन वाढले असल्याने त्यांच्याही नावाचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, राज्यात निवडून आलेले कॉंग्रेसचे 41 आमदार सध्या जयपूर येथे असून त्यांची बैठक आज पार पडली. त्यात अनेक नवनिर्वाचित आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण जर बाहेरून पाठिंबा देण्याऐवजी सत्तेत सहभागी झाल्यास त्याचा फायदा कॉंग्रेसला निश्चित होवू शकतो असाही सुर आता येत आहे.
दिलीप वळसे-पाटील पुन्हा विधानसभा अध्यक्ष ?
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांची सातव्यांदा आमदारकीची टर्म सुरू झाली आहे. सत्तेत असताना त्यांनी अर्थ, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण यांसह 2008 ते 2014 या कालावधीत विधानसभा अध्यक्षपदही भूषविले आहे, त्यांचा हा दांडगा अनुभव पाहता आणि नवीन समीकरणे जुळून आली तर त्यांना पुन्हा विधानसभा अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवारांच्या गळ्यात कोणती माळ येणार ?
राज्यात जर महा”शिव’आघाडी जुळून आली तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणते पद मिळणार हे पाहणे सर्वाधिक औत्स्युक्याचे आहे. कारण आघाडीच्या काळात त्यांनी विविध पदांसह उपमुख्यमंत्रीपदही भूषविले असल्याने त्यांचा राजकीय अनुभव चांगलाच दांडगा आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाच, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला उपमुख्यमंत्रीपद निश्चित मिळणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे हे पद पुन्हा अजित पवारांना मिळणार की त्यांना दुसरे कोणते पद मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेनेला मिळणार नवसंजीवनी
राज्यात महा”शिव’आघाडीचे नवीन समीकरण जुळून आले तर जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये नवीन उत्साह संचारेल व ते नव्या जोमाने कामाला लागतील यात शंका नाही. दरम्यान, जिल्ह्यातील 21 मतदारसंघामध्ये एकही शिवसेनेचा आमदार नाही, तर चार लोकभा मतदारसंघापैकी केवळ मावळ मतदारसंघात श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये एकप्रकारे मरगळ आली आहे.
नवीन समीकरणामुळे जर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुणे जिल्ह्याकडे दुर्लक्ष न करता किमान एक मंत्रीपद तरी बहाल करून शिवसैनिकांमध्ये नवसंजीवनी निर्माण करतील, अशी आशा आहे. जिल्ह्यातील खेड, जुन्नर तालुक्यात शिवसेनेची चांगली पकड आहे.
मात्र, विधानसभा निवडणुकीत खेडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेला साथ न देता बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा प्रचार केला. तर जुन्नरमध्ये नाराज शिवसैनिकांनीच शिवसेनेला दगा दिला. तर आंबेगावात शेवटपर्यंत उमेदवारच सापड नव्हाता. एवढी दुरदैवीवेळ शिवसेनेवर का, आली हे आत्मपरिक्षण करण्यासारखे आहे. मात्र, झाले गेले विसरून नव्या जोमाने कामाला लागण्याचे शिवसैनिकांनी ठरवले आहे.