मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने जुलै महिन्यात जामीन नाकारला होता.त्यानंतर मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागत जामिनासाठी अर्ज केला. आज नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.अशात आता नवाब मलिक यांचं समर्थन अजित पवार गटाला असेल कि ते शरद पवार यांच्या सोबत राहतील याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाल्या आहेत. अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे.
नवाब मलिकांनी वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. “आम्हाला याबाबत निश्चितच समाधान आहे. नवाब मलिक यांनी गेल्या 25-30 वर्षात आपल्या कामाद्वारे ठसा उमटवला आहे, असेल आणि राहिल. आजच्या सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचा आम्ही स्वागत करतो” अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
आता नवाब मलिक यांचे समर्थन कोणाला असेल ? असा सवाल विचारला असता तटकरे म्हणाले,”नवाब मलिक लॉंगटर्म राजकारण करणारे प्रगल्भ राजकीय नेते आहेत. याबाबतची भूमिका ते स्पष्ट करतील. मलिक यांना आधी त्यांची भूमिका स्पष्ट करु द्या, त्यानंतर आम्ही भूमिका स्पष्ट करु” असं तटकरे यावेळी म्हणाले.
मलिकांवर ईडीने केला आहे आरोप
मुंबईच्या कुर्ला भागातील दाऊदच्या हस्तकांकडून मलिकांनी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. 20 वर्षांपूर्वी दाऊद इब्राहिमच्या हस्तक, त्याची बहिण हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी मूळ मालकाला धमकावून त्या जमिनीचा व्यवहार केला होता, असेही ईडीकडून सांगण्यात आले आहे.