Navneet Rana on Aditya Thackeray – खासदार नवनीत राणा आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणा दाम्पत्याने त्यांना चॅलेंज करत केलेलं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. ठाकरे विरोध राणा असा वाद बऱ्याच दिवसांपासून धगधगत असून नवनीत राणा यांनी आज आदित्य ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करत या वादात तेल ओतण्याचे काम केले आहे. आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्याविषयी बोलताना नवनीत राणा यांनी, ““मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत,” असं म्हणत ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं आहे.
एका वृत्तसंकेतस्थळाशी बोलताना नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात दाखल झाली. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर गेले आहेत. ठाकरे यांनी गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्याची खिल्ली उडवताना राणा यांनी त्यांना पप्पू संबोधलं आहे.
अशा पप्पू लोकांनाच…
“अशा पप्पू लोकांनाच महाराष्ट्रावर विश्वास नाही. महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास नाही म्हणूनच दुसऱ्या राज्यात जाऊन इतरांसमोर हात पसरत आहेत. त्यांनी इथं महाराष्ट्रात काम केलं असतं आणि गरीब जनतेमध्ये राहिले असते, त्यांच्या प्रश्नांवर काम केलं असतं तर महाराष्ट्राचं खूप चांगलं झालं असतं.” असं नवनीत राणा म्हणाल्या.
“मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत. शरद पवार असो की आमचे इतर मोठे नेते ज्यांना आम्ही फॉलोव करतो त्यांना महाराष्ट्राच्या जनतेवर आणि निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्र सोडून बाहेरची मदत घेण्याची गरज पडत नाही.” असंही राणा यांनी म्हंटलंय.