प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 25 -केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने यंदा देशातील 46 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून, यात महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा समावेश आहे. येत्या 5 सप्टेंबरला नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
दरवर्षी केंद्रीय मंत्रालयाकडून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असते. शिक्षकांकडून ऑनलाइन अर्ज मागवून त्यांच्या अर्जांची विशेष समितीकडून पडताळणी करुन मुलाखती घेऊन निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे संचालक जी. विजया भास्कर यांनी पुरस्काराची यादी नुकतीच जाहीर केली आहे. शिक्षकांना पदक, प्रमाणपत्र व 50 हजार रुपये या स्वरुपात पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. प्रामुख्याने प्रत्येक राज्यातून दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील सोमनाथ वामन वाळके, शशिकांत संभाजीराव कुलथे या दोन शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. वाळके हे पारगाव जोगेश्वरी जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, आंबेजोगाई शिक्षण कट्टा समन्वयक व उपक्रमशील शिक्षक म्हणून ते परिचित आहेत. कुलथे हे गेवराई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत आहेत.