मूलभूत सुविधांचा ठणठणाट : काटेरी झुडपांचा विळखा, नागरिक संतप्त
नीरा नरसिंहपूर – नीरा- नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. हे शेड गावातील जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे. त्यामुळे स्मशानभूमीला गोठ्याचे स्वरूप आले आहे. जनावरांचा कळप गाई व म्हशी यांच्या निवाऱ्याचे स्थान बनले आहे. स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे.
येथील लक्ष्मी नृसिंहाच्या देवस्थान आराखड्यासाठी 260 कोटी निधी येऊन सुद्धा स्मशानभूमीची अवस्था केविलवाणी झाली आहे. आराखड्यामध्ये स्मशानभूमी आहे की नाही, असा सवाल नागरिकांतून उमटत आहे.
भीमा नदीकाठी व भक्तनिवासांच्या बाजूस पूर्वीपासून असलेल्या स्मशानभूमीत पाणी, रस्ता, विजेची व्यवस्था नाही. त्यामुळे गोठा आणि स्मशानभूमी या दोन्हीतील फरक नागरिकांना समजेनासा झाला आहे. पावसाळा व उन्हाळ्यात जनावरे स्मशानभूमीत थांबत आहे. तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये स्मशानभूमी कामाचे नियोजन असेल तर त्याची सुरुवात केव्हा होईल, असा सवाल ग्रामस्थांमधून उमटत आहे.
स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे. तेथे सुविधा देण्याची गरज असताना ग्रामपंचायत डोळेझाक करीत आहे. पाण्याची वानवा आहे. तसेच परिसरात काटेरी झुडपांचे झाडे साम्राज्य पसरले आहे. स्मशानभूमीलगत खड्डे पडले आहेत.