मुंबई : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अलीकडेच रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेतून ‘कुणी आम्हाला देशद्रोही म्हटले तर त्याची जीभ हासडून टाकू, असे विधानही उद्धव ठाकरेंनी करत भाजपवर सडकून टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या या सभेनंतर केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नारायण राणे यांनी त्यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये जीभ हासडण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना नारायण राणे यांनी, “आहो, उद्धव ठाकरे कुणाचाही जीभ हासडण्याआधी स्वत:ची जीभ सांभाळा… असंच फिरत राहिलात तर ती जीभही जागेवर राहणार नाही. एकनाथ शिंदे यांनी डेरिंग करून दाखवली. ते ४० आमदारांना घेऊन गेले. जाताना ते उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ म्हणून गेले. यावर उद्धव ठाकरेंनी काय केलं? त्यातली एकाची तरी जीभ किंवा नाक का नाही पकडलं? हात का नाही पकडला? ४० लोक निघून गेले पण उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबवलं का? ते कसलं बोलतात, तो शब्द त्यांना शोभत नाही.”
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विरोधी पक्षाला चहापानाचं आमंत्रण दिलं होतं. पण चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षावर टीका केली. ‘बरं झालं, देशद्रोह्यांबरोबर चहापान टळला’ असे विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
खेडमधील सभेतून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “काल परवा मिंधे बोलले, बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं. त्यांच्या विधानानंतर सगळ्यांनी धुडगूस घातला. मग ते म्हणाले, नाही… नाही… नाही… मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही बोललो नाही. अरे पण तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय.”