-सरोजिनी घोष
धर्माच्या आधारावर मते विभाजित होताना आजकाल दिसत आहे. मात्र निकोप समाज आणि निकोप लोकशाहीसाठी हे कदापि चांगले लक्षण मानता येणार नाही.
सुमारे चौदा वर्षांपूर्वी 14 मार्च 2007 रोजी पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनापूर जिल्ह्याचा नंदीग्राम विभाग चर्चेत आला होता. पोलिसांनी या दिवशी तेथे केलेल्या गोळीबारात 14 जण ठार झाले होते. तत्कालीन डाव्या आघाडीच्या सरकारने विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (सेझ) शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण केले होते आणि अधिग्रहणास विरोध केल्यामुळेच या 14 जणांना प्राणाला मुकावे लागले होते. या घटनेनंतरच डाव्या आघाडीच्या सरकारची उलटगणती सुरू झाली होती. तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी अत्यंत चाणाक्ष राजकीय खेळी करून हा मुद्दा प्रचंड तापवला आणि या प्रकरणावरून आंदोलन सुरू केले. नंदीग्रामपासून राजकीय लढाई सुरू केल्यानंतर अखेर 2011 मध्ये त्या रायटर्स बिल्डिंगमध्ये पोहोचण्यात (राज्यात सत्तेवर येण्यात) यशस्वी झाल्या.
ममता बॅनर्जींना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवून देण्यात नंदीग्रामचा वाटा मोठा आहे, यात काहीही अतिशयोक्ती नाही. परंतु त्या आंदोलनात ममतांचे निकटवर्ती मानले जाणारे शुभेंदू अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची भूमिका खूपच महत्त्वाची होती, हेही नजरेआड करता येणार नाही. शुभेंदू आता भाजपमध्ये असून, सध्या परिस्थितीच खूप वेगळी असल्यामुळे ममता खिन्न आहेत. शुभेंदू यांच्या भाजप प्रवेशामुळे या जिल्ह्यात तृणमूल कॉंग्रेस विरुद्ध भाजप असा सामना नसून, दीदी (ममता) विरुद्ध दादा (शुभेंदू) असा आहे. 14 मार्च 2007 च्या घटनेनंतर सुमारे 14 वर्षांनी 2021 मध्ये सुमारे 33 लाख लोकसंख्या असलेला हा विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथून निवडणूक लढविण्याची केलेली घोषणा आणि शुभेंदू अधिकारी यांनी ममता यांना 50 हजारपेक्षा अधिक मताधिक्याने पराभूत करण्याचे दिलेले आव्हान!
नंदीग्राम येथून निवडणूक लढविण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाकडे राजकीय क्षेत्रात “मास्टरस्ट्रोक’ मानले जात आहे. नंदीग्राममधून त्यांनी निवडणूक लढविण्यामागे अनेक कारणे आहेत. परंतु प्रमुख कारण आहे शुभेंदू अधिकारी यांना धोबीपछाड देणे. नकाशावर नंदीग्रामला केवळ एक गाव म्हणून ओळख असली, तरी राजकीय पूर्वेतिहास पाहिला असता हे केवळ गाव नसून राजकीय इतिहास बदलण्याचे ठिकाण आहे. याच ठिकाणी आंदोलन करून ममता “अग्निकन्या’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आणि 34 वर्षे डाव्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन घडवून पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या.
आता पुन्हा एकदा नंदीग्राम चर्चेत आहे. ममता बॅनर्जी नंदीग्रामला खूप महत्त्व देतात. कारण या क्षेत्राला त्या आपल्या राजकीय यशस्वितेचा मैलाचा दगड मानतात. राजकीय निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार शुभेंदू यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ममतांसाठी नंदीग्राम हे मोठे आव्हान ठरणार आहे, कारण भाजपने राज्याच्या राजकारणात बऱ्याच अंशी स्थान निर्माण केल्यानंतर शुभेंदू ममतांना सोडून भाजपमध्ये गेले आहेत. स्थानिक असल्यामुळे नंदीग्राम आणि पूर्व मेदिनापूर जिल्ह्यावर नेहमीच अधिकारी कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. कदाचित यामुळेच शुभेंदू यांना भाजपमध्ये खूप मानाचे स्थान मिळाले आहे. 2007 मध्ये नंदीग्राममध्ये एक घोषणा दिली जात होती, “तोमार नाम, आमार नाम, नंदीग्राम, नंदीग्राम.’ राजकीय जाणकार असे सांगतात की, जर ममतांनी नंदीग्राममधून स्वतः लढण्याचा निर्णय घेतला नसता तर तृणमूलने या मतदारसंघातून एखाद्या मुस्लीम व्यक्तीलाच उमेदवारी दिली असती. अशा स्थितीत भाजपला हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाची मदत झाली असती. परंतु ममतांनी जो डाव खेळला आहे, त्यातून भाजपच्या खेळीला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.
गेल्या तीन निवडणुकांच्या आकडेवारीवरून असे दिसते की, नंदीग्राममध्ये मुस्लीम मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरते. 2006 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर राहिलेले दोन्ही उमेदवार मुस्लीम होते. निवडणूक जिंकलेल्या आणि हरलेल्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमधील अंतर त्यावेळी 3.4 टक्के होते. 2011 मध्ये तृणमूलच्या मुस्लीम उमेदवाराने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या हिंदू उमेदवाराला पराभूत केले होते आणि जय-पराजयाचा निर्णय एकूण झालेल्या मतदानापैकी 26 टक्के मतांनी झाला होता. 2016 मध्ये शुभेंदू अधिकारी यांनी 2011 मध्ये तृणमूलला मिळालेल्या मतांपेक्षा सात टक्के अधिक मते मिळविली होती. त्या वेळी तर माकपने मुस्लीम उमेदवारच मैदानात उतरविला होता.
पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे 14.6 टक्के इतकी आहे. परंतु खुद्द नंदीग्राममध्ये मुस्लीम मतदार निर्णायक ठरू शकतात. ही सर्व एकंदर परिस्थिती पाहिली असता, नंदीग्राम सत्ता परिवर्तनाचे किंवा सत्तासंघर्षाचे प्रतीक ठरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.