नांदेड(प्रतिनिधी) : आज सकाळी नगीनाघाट येथे लाखोंच्या संख्येत मरण पावलेली मासे पाहून नांदेडमध्ये एक नवीनच भीती पसरली आहे. नांदेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या अंतर्गत सफाई करण्यासाठी करोडो रुपयांचा निधी देण्यात आला होता, पण अद्यापही शहरातील अनेक नाल्यांमधून घाण पाणी वाहत नदीत येते. नदीच्या काठावर आज सकाळी मेलेल्या माशांचा थर दिसला. सर्वत्र नदीत मासेच मासे दिसत होते आणि ते सुद्धा मेलेले.
गेले काही दिवस नांदेड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. पाणीपातळीत थोडीशी वाढ झाली असली तरी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत नाहिये. आज अचानक नदीत मासे मृत्युमुखी पडले, नदीकाठी मृत माशांचा खच पडला असून नदीकाठी तीव्र दुर्गंधी पसरली आहे. लाखो माशांच्या मृत्यूमुळे नांदेड शहरासह महापालिकेचे प्रदूषण नियंत्रण मंडळ हादरले आहे.लाखो मृत माशांचा ढीग लागला आहे, नदीपात्रात रसायन मिश्रीत पाणी प्रक्रिया न करता सोडल्याने किंव्हा पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नांदेडच्या या गोदावरी नदीच्या साफसफाईकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा स्थानिकांनी गंभीर आरोप केला आहे. लाखोंच्या संख्येने मासे मृत झाल्याची नांदेड मधील ही पहिलीच घटना आहे. या पात्रातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर त्यामागील नेमके कारण काय आहे समजू शकेल, असेही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.