मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘सध्याचे वातावरण पाहता काँग्रेस स्वबळावर निवडून येऊ शकते’ त्यासोबतच अशी महाराष्ट्रात परिस्थिती असल्याचा दावा केला आहे. नागपुरात काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पाडली. काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यांना बंद दाराआड संबोधित करताना नाना पटोले यांनी स्वबळाचा दावा केला आहे.
ज्या कोकणात आपला एकही आमदार नाही, तिथे आपले आमदार निवडून येतील अशी स्थिती आहे. सोलापूर , नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आमदारांची संख्या नगण्य असली तरी तिथे आपले आमदार वाढणार असल्याचा दावा नाना पटोलेंनी केला. महाविकास आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निवडणुका एकत्रितपणे कशा लढायच्या याबद्दल तिन्ही पक्षात चर्चा होणार आहे. तरी त्याच्या पूर्वसंध्येला काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र स्वबळाची भाषा करत होते.
सध्या राज्यात जो वातावरण आहे त्यात काँग्रेस महाराष्ट्रात स्वबळावर निवडून येऊ शकते अशी परिस्थिती असल्याचे पटोलेंनी म्हटले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जे शरद पवार 1999 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले होते, तेच शरद पवार काँग्रेसच्या स्थापना दिवसाला कॉंग्रेसच्या पुणे येथील कार्यालयात आले होते. त्यामुळं काँग्रेसला कोणी संपवू शकत नाही असेही नाना पटोले म्हणाले.
सांगण्याचं तात्पर्य म्हणजे जे काँग्रेसला संपवायला निघाले होते, जे सतत कुरघोड्या करत होते की काँग्रेस संपली तर आपण जिवंत राहू. मात्र, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर तेच लोकं काँग्रेस संपू शकत नाही असे बोलू लागले आहेत. ही आपल्यासाठी संधी असल्याचे सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. मुंबईच्या जवळपासचे परिसर आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. ठाणे, पालघर, नवी मुंबई या जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही ताकदीचे लोक काँग्रेसमध्ये असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. ते लोक खोकेवाले नाहीत आणि धोकेवालेही नाहीत अस सूचक वक्तव्य करत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला.