ठेवीदारांच्या बैठकीत संचालकांच्या नावाने हल्लाबोल
नगर – रिझर्व्ह बॅंकेने बॅंकिंग परवाना रद्द केलेल्या नगर अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांचा येत्या बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयावर सकाळी 11 वाजता मोर्चा नेण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला. येथील खाकीदास बाबा मठात झालेल्या ठेवीदारांच्या पहिल्या बैठकीत बॅंक बुडवणाऱ्या संचालकांच्या नावाने हल्लाबोल करण्यात आला. या सर्वांना जेलमध्ये घातल्याशिवाय कोणीही स्वस्थ बसायचे नाही, असा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला.
113 वर्षाची परंपरा असलेल्या नगर अर्बन बॅंकेचा बॅंकिंग परवाना दि. ऑक्टोबर रोजी रिझर्व्ह बॅंकेने रद्द केला. त्यामुळे बॅंकेचे व्यवहार व कामकाज बंद झाले आहे. बॅंकेच्या पाच लाखाआतील ठेवीदारांना दोन टप्प्यात त्यांचे पैसे मिळाले असले तरी यापैकी राहिलेल्या ठेवीदादांचे तिसऱ्या टप्प्याचे 42 कोटी मिळालेले नाहीत. याशिवाय पाच लाखांवरील 1600 वर ठेवीदारांचे सुमारे 300 कोटी रुपये बॅंकेत अडकलेले आहेत. त्यामुळे हे पैसे मिळण्याचे नियोजन करण्यासाठी रविवारी साय. खाकीदास बाबा मठात ठेवीदारांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाभरातून अनेकजण आले होते.
कोणी मुला-मुलींच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी व अन्य विविध कारणासाठी म्हणून बॅंकेत विश्वासाने पैसे ठेवले, परंतु बॅंकेवर विश्वस्त म्हणून आलेल्या संचालकांनी या पैशांची मनमानी लूट केली. त्यामुळे बॅंक अडचणी आली. चुकीचे कर्ज वाटप केल्याने 800 कोटी वर येणे बाकी आहे. हे पैसे वसूल होणार कधी व ठेवीदारांचे पैसे मिळणार कधी, असे विविध प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. स्वतःवरील आपत्ती सांगताना काही महिला ठेवीदारांच्या डोळ्यात पाणीही आले. बॅंक बुडण्यास कारणीभूत असलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांची प्रॉपर्टी जप्त करून व ती विकून ठेवीदारांचे पैसे दिले गेले पाहिजे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी लवकरच पालकमंत्री यांची भेट घेण्याचेही ठरवण्यात आले.
बॅंकेचे ठेवीदार डी. एम. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या ठेवीदारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॅंक बचाव कृती समितीचे प्रमुख व बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी, ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा, ऍड. अच्युत पिंगळे, मनोज गुंदेचा, सीए राजेंद्र काळे, आर. डी. मंत्री, एस. झेड. देशमुख, प्रकाश गांधी, महेश देवरे, संजय झिंजे, बहिरनाथ वाकळे, यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते.
जरांगेंचा आदर्श घ्या
राजेंद्र चोपडा यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दाखला दिला.तो एकटा माणूस पंधरा दिवस उपोषणाला बसला तर त्यांनी राज्य हलवून टाकले आहे. त्यामुळे त्यांचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. आपल्यालाही मोर्चे, उपोषण व अन्य आंदोलनात्मक मार्ग स्वीकारायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या आवाहनास टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.