पाथर्डी : राहुरी येथील वकील दांपत्याची हत्या करण्यात आली असून, या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी तालुका वकील संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी वकिलांना संरक्षण कायदा लागू करावा, आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करून मागण्यांचे निवेदन पाथर्डी तहसीलदारांना देण्यात आले. ३ फेब्रुवारीपर्यंत वकील संघटनेने महसुली प्रशासकीय कामासंदर्भात कामकाज न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी सकाळी पाथर्डी न्यायालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.राजेंद्र खेडकर, उपाध्यक्ष अँड.वैजनाथ बडे, सचिव अँड.प्रशांत भाबड आदीसह वकील मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. वकील संरक्षण कायदा त्वरित अंमलात आणावा, घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या घटनेचा सखोल तपास करावा अशा घोषणा मोर्चादरम्यान मोर्चेकर्यांनी दिल्या.
राहुरी येथील वकील दांपत्य अॅड. राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अॅड.मनिषा आढाव या दोघांचे अपहरण करून नंतर निघृण खून करून मृतदेह उंबरे गावातील स्मशानभूमी जवळील विहिरीत दगड बांधुन टाकुन दिले. या घटनेचा निषेध म्हणून जिल्हयातील सर्व तालुक्यातील वकी लसंघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला.
वकिलांवर अशी परिस्थिती ओढावेत असेल तर या परिस्थितीचे गांभीर्य घेऊन शासनाने वकील संरक्षण कायदा त्वरित संमत करावा, या हेतुने जिल्हयातील सर्व न्यायालयातील कामकाजापासून दि. ३ फेब्रुवारीपर्यंत सर्व वकिलांनी अलिप्त रहावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.