नगर – एकीकडे महापालिकेच्या मुख्यालयापासून चारही प्रभाग कार्यालयांमध्ये व दोन उपकार्यालयांमध्ये शुकशुकाट व दुसरीकडे शहरभर रस्त्याच्या कडेला पडलेले कचर्याचे ढीग, असे चित्र मंगळवारी नगरमध्ये होते. परिणामी मनपाचे काम ठप्प आहे. साफसफाईच व कचरा उचलला न गेल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग साठले आहेत.
पुढील 16 दिवस महापालिकेचे कामकाज ठप्प राहणार असल्याने महापालिकेत शुकशुकटात आहे.कर्मचार्यांच्या लॉंग मार्चचा फटका नगरकरांना अस्वच्छतेच्या माध्यमातून बसला आहे. दरम्यान, मनपामध्ये प्रोबेशनवर असलेल्या 77 सफाई कामगारांना व अन्य विविध विभागात असलेल्या 20जणांना शिस्तभंगाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आंदोलनाच्या नावाखाली अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालयाकडे पाठ फिरविली असून, ते ‘लॉंगमार्च’ मध्येही सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे आंदोलनाचा गैरफायदा घेऊन स्वतःची कामे करून घेणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करते का नाही हे लवकरच स्पष्ट होईल?
गेल्या महिनाभरापासून महापालिका कामगार संघटना या लॉंगमार्चचे नियोजन करीत होते. सातवा वेतन जा आयोग व वारसा हक्काने नोकरी या दोन मागण्यांसाठी लॉंगमार्च काढण्यात आला आहे. शहरातील साफसफाईसाठी महापालिका प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली आहे. पुढील 15 दिवसांसाठी सुमारे तीनशे खासगी कर्मचारी नियुक्त केले आहेत. परंतु नागरिकांकडून काम करण्यासाठी विरोध होत आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले दैनंदिन स्वछता न झाल्यामुळे कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे.
लॉंगमार्चला गेलेल्या कर्मचाऱ्यांचा मंगळवारी दि. 3 रात्री भाळवणी येथे मुक्काम आहे. या लॉंगमार्चमध्ये पहिल्या दिवशी 900 ते 1000 कर्मचारी सहभागी झाले होते. त्यात घट झाली असून, 500 ते 600 कर्मचारी या आंदोलनात असल्याची माहिती मिळाली आहे. पाणीपुरवठा, आरोग्य आणि अग्निशामक विभाग वगळता बहुतांश विभागाला टाळे लागले आहे. महापालिका मुख्यालयात केवळ आयुक्त आणि त्यांच्या नेतृत्वाखालची प्रशासकीय अधिकाऱ्यांची टिम बसून आहे. मात्र कर्मचारीच नसल्याने एकही फाईल इकडची तिकडे होत नसून, संपूर्ण प्रशासकीय कामे ठप्प आहेत. कर्मचाऱ्यांअभावी संपूर्ण कार्यालय ‘ओस’ पडले आहे. लॉन्ग मार्च 17 तारीख पर्यंत चालणार आहे. तो पर्यंत असेच पालिकेला तळे लागणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तसेच 16 दिवस काम कसे होणार या चिंतेने पालिका प्रशासन आता अस्वस्थ आहे.
आ. संग्राम जगताप तोडग्याच्या प्रयत्नात
कामगार संघटनेचा लॉंग मार्च होऊ नये म्हणून बैठक घेताना मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याची ग्वाही आ. संग्राम जगताप यांनी दिली होती. त्याअनुषंगाने त्यांनी कालच मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सामाजिक न्यायमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आज-उद्या ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सकारत्मक निर्णय होतील अशी शक्यता आहे.
सत्ताधाऱ्यांचे प्रोत्साहन?
मनपा कामगार-कर्मचार्यांच्या लॉंग मार्चला राज्यातील सत्ताधारी महायुतीच्या काहींचे प्रोत्साहन असल्याची शहरात चर्चा आहे. सातवा वेतन आयोग व वारसा हक्काने नोकरीचा विषय राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मार्गी लावणे गरजेचे असताना नगरमध्ये मात्र काही मुख्यमंत्री शिंदे समर्थकांनी लॉंग मार्चला निघालेल्यांना शुभेच्छा दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांचे असे प्रोत्साहन स्थानिक राजकारणातून आहे की अन्य काही कारणाने याचीही चर्चा रंगू लागली.
पाठ फिरवणाऱ्यांवर कारवाई काय?
अनेक कर्मचारी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झालेले नसून, ते कार्यालयातही हजर नाहीत. केवळ आंदोलनाच्या आडून त्यांनी त्यांची वैयक्तिक कामे करून घेण्यावर भर दिल्याची चर्चा आहे. अशा कर्मचाऱ्यांवर कोणती कार्यवाही केले जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसेच खाजगी ठेकेदार संस्थेमार्फत घरोघरी कचरा संकलनाचे काम सुरूच राहणार आहे. असे आयुक्त जावळे यांनी सांगितले. नागरिकांनीही सहकार्य करावे कचरा बाहेर इतरत्र टाकू नये, जे कर्मचारी सहभागी नाही वेळप्रसंगी मेस्माअंतर्गत कारवाईचा विचार केला जाईल
डॉ. पंकज जावळे आयुक्त