नगर,(प्रतिनिधी) – भिंगार शहरातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे भिंगार ते मेहेकरी दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. या खड्ड्यांमुळे सुनील विजयकुमार बेरड या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला आहे.
त्यामुळेसंबंधित महामार्गाच्या कामाची जबाबदारी असलेले अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिक्षक सेलचे शहर जिल्हा अध्यक्ष रवींद्र गावडे, भिमराज कराळे, चैतन्य ससे, अभिषेक जगताप, ऋषी शेटे, राहुल पवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गाचे काम ठेकेदारामार्फत जलद गतीने पूर्ण करून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. अधिकारीच काम चुकारपणा करीत असल्याने ठेकेदारांवर अंकुश राहिलेले नाही. दरवेळी अपघात घडल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून प्रशासन वेळ काढू पणा करत असल्याचा आरोप यावेळी केला.