शेवगाव – शेतकऱ्यांना मतापुरते वापरायचे अन् देशासह राज्यात भांडवलशाही विचाराचं राजकारण करून निवडणुका जिंकायच्या तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणूनबुजून डोळेझाक करायची हीच नीती देशासह राज्यात वापरल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये सरकार विरुद्ध संतापाची लाट आहे.
एकीकडे अधिवेशनात प्रश्न मांडावा, यासाठी शिंदेसारख्या युवकांना उपोषणाची वेळ येते., ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने खेदाची गोष्ट आहे. शिंदे यांनी मांडलेल्या मागण्या रास्त असून त्या अधिवेशनात चर्चा होऊन मार्ग निघावा, अशी अपेक्षा उपोषणकर्त्यांसह शेतकऱ्यांच्या मनात असल्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ . सुभाष पाटील लांडे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील नवीन दहिफळ येथे हनुमान मंदिरात बाळासाहेब शिंदे यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण सोडतेवेळी कॉ. लांडे शासनाच्या भूमिकेवर टीका केली. संसदेच्या व विधानसभा हिवाळी अधिवेशनात शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला योग्य हमीभाव, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती ,शेतकऱ्यांवरील कर्जबाजारीचे संकट, सरकारचे चुकीचे शेतीमाल आयात-निर्यात धोरण, शेतीमालाचे भावाअभावी होणारे नुकसान, महागाईची झळ, युवकावर आलेले बेरोजगारीचे संकट या शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर अधिवेशनात चर्चा होऊन ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून बाळासाहेब सदाशिव शिंदे हे शेतकरी नविन दहिफळ येथे हनुमान मंदिरासमोर आमरण उपोषणास बसले होते.
आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी भाकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. सुभाष पाटील लांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, मच्छिंद्र आर्ले, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर, भारत महाराज लोढे यांच्याहस्ते लिंबू पाणी घेऊन शिदे यांनी उपोषण स्थगित करून यापुढे बैठा सत्याग्रह करण्याचा निर्धार शिंदे यांनी जाहीर केला . यावेळी रामकिसन तुजारे, दीपक भोसले, कडुबाळ इथापे, संदीप इथापे, आनंद गांधी, नारायण गंवादे, नारायण गावडे, शंकर शिंदे, कचरू इसारवाडे, भाऊसाहेब आर्ले, सतीश कणगरे, हरिष जायभाय, शहाराम आगळे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.