के. श्रीनिवासन
दक्षिणेतील कलाकार आणि राजकारण हा निकटचा संबंध. दक्षिणेतील कलाकारांनी मोठमोठी राजकीय पदे, मुख्यमंत्रिपददेखील भूषविले आहेत. यामागचे कारण म्हणजे त्यांची लोकप्रियता. एमजीआर, एनटीआर, जयललिता या मंडळींच्या लोकप्रियतेमुळे दक्षिणेतील राजकारणात एकाधिकारशाही राहिली आणि आजही त्याची छाप दिसून येते. रजनीकांत, कमल हसन, खुशबू सुंदर यासारख्या मातब्बर कलाकारांचा देखील उल्लेख करता येईल. सांगायचे तात्पर्य एवढेच की एन. टी. रामाराव यांचे नातू ज्युनिअर एनटीआर यांच्या राजकीय प्रवेशावरून सध्या चर्चेला उधाण आले आहे. यावरून दक्षिणेतील कलाकार आणि राजकारण यांचे संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ( Junior NTR’s entry into politics )
सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर हे चित्रपटाशिवाय राजकारणातील संभाव्य प्रवेशावरून चर्चेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हैदराबाद दौऱ्यात ज्युनिअर एनटीआर भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर राजकीय तर्कवितर्कांना वेग आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी आगामी निवडणुकीत ज्युनिअर एनटीआर भाजपसाठी प्रचार करतील, असे सांगितले. तेव्हापासून ज्युनिअर एनटीआर राजकारणात येणार का? याबाबत चर्चा सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची भाजपशी जवळीकही वाढली आहे आणि ती अनेकदा दिसूनही आली आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अगोदर भाजपला दक्षिणेत विस्तार करायचा असून त्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. ज्युनिअर एनटीआर हे भाजपच्या योजनेत सामील होऊ शकतात. ज्युनिअर एनटीआर यांच्या चर्चेने वायएसआर आणि तेलगू देसम यांच्या राजकीय हालचालींना वेग आला. जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाची भाजपशी जवळीक आहे तर तेलगू देसम हे आगामी निवडणुकीत पुन्हा एनडीएत सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्युनिअर एनटीआर हे केवळ राजकीय प्रवेशावरूनच नाही तर आतापर्यंतचा सर्वाधिक सुपरहिट ठरलेल्या “आरआरआर’ चित्रपटात आदिवासी नेते कोमुरम भीम याचे पात्र साकारल्यावरूनही चर्चेत आले. अर्थात त्यांच्या या भूमिकेवरून तेलंगण भाजपने आक्षेप घेतला होता. ( Junior NTR’s entry into politics )
प्रत्यक्षात ज्युनिअर एनटीआर हे दक्षिणेतील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबा एन. टी. रामाराव हे तेलगू देसम पक्षाचे संस्थापक. तेलगू चित्रपटात त्यांना मानाचे स्थान राहिले. चित्रपट व राजकीय वारसा या दोन्ही गोष्टी ज्युनिअर एनटीआर यांच्या पाठीशी आहेत. पण आतापर्यंत त्यांनी चित्रपटाच्या माध्यमातूनच वर्चस्व निर्माण केले आहे. 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत टीडीपीसाठी त्यांनी प्रचार करत काही काळासाठी का होईना राजकीय एंट्री केली. परंतु त्यानंतर ते दूर गेले होते.