चेन्नई – तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या ( Jayalalithaa Death Case ) मृत्यूच्या संदर्भात तपास करणाऱ्या न्यायालयीन चौकशी आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना केली आहे. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्या भूमिकेबद्दलही आयोगाने प्रश्न उपस्थित केले असून तमिळनाडू सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावरही संशय व्यक्त केला आहे. जयललिता यांचा 2016 मध्ये रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.
या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगाने ऑगस्ट महिन्यात सरकारला आपला अहवाल सादर केला असून सरकारने ते विधिमंडळाच्या पटलावर ठेवला आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. अरूमुगास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली 2017 मध्ये चौकशी आयोग स्थापन करण्यात आला होता. उपचार सुरू असताना जयललिता यांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर संशय व्यक्त करत अनेक तर्क लढवले जात होते. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने यात लक्ष घातले होते. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तमिळनाडूमध्ये जयललिता यांच्या अद्रमुक पक्षाचेच सरकार होते. मात्र, तपासाला खरी गती 2021 मध्ये स्टॅलीन यांच्या नेतृत्वाखाली द्रमुकचे सरकार स्थापन झाल्यानंतरच आली. आपण सत्तेवर आल्यावर जयललिता यांच्या मृत्यूबाबतचे संशयाचे वातावरण दूर करणार असे आश्वासनच त्यांनी दिले होते.
न्या. अरूमुगास्वामी यांच्या अहवालात तमिळनाडूचे तत्कालीन मुख्य सचिव रामा मोहन राव यांच्याबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यांना थेट गुन्हेगारी कृत्यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री विजय भास्कर यांच्यावरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर अपोलो इस्पितळाचे अध्यक्ष डॉ. प्रताप रेड्डी यांनी जयललिता यांच्या प्रकृतीबाबत चुकीचे निवेदन दिले होते असा ठपकाही ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे न्या. अरूमुगास्वामी आयोगाच्या तपासाच्या कक्षेतून आम्हाला बाहेर काढावे असे याच अपोलो इस्पितळाने गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. न्यायाधीश पक्षपातीपणा करत असल्याचा दावा अपोलोने केला होता. त्यांना वैद्यकीयच्या बाबतीत कोणतेच ज्ञान नाही असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही काळ आयोगाचा तपास थांबवला होता व एक वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
आयोगाने आपल्या तपासाच्या काळात माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम, जयललिता यांची भाची दीपा, भाचा दीपक आणि शशिकला यांचीही चौकशी केली होती. जयललिता यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे त्यांची भाची आणि भाच्यानेही आयोगाला सांगितले होते. तत्कालीन आरोग्य मंत्री विजय भास्कर यांच्यावरही गंभीर ठपका ठेवण्यात आला आहे. ते आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या विरोधात करत होते व द्रमुकची मदत करत होते असे नमूद करण्यात आले आहे.