आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदी येथे मराठी भाषा दिनी स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत नागरिकांनी बाह्यवळण मार्ग स्वच्छ करत स्वच्छतेची शपथ घेतली. यावेळी ग्यानज्योत इंग्लिश मीडियमचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, व्यवस्थापक विजय धादवड, मुख्याध्यापिका प्रीती उंबरकर, रश्मी संभे, श्री साई कन्सल्टान्सी चॅरिटेबल ट्रस्टचे शुभम पाटील, सामाजिक कार्यकर्ते बालाजी नागरगोजे, मयुरेश्वर संस्थेचे अध्यक्ष मयूर पेटकर, पत्रकार ज्ञानेश्वर फड, प्रभाकर दराडे, यांसह शालेय विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होऊन स्वच्छता केली.
आळंदी नगरपरिषद, केळगाव व चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत तसेच आळंदी जनहित फाउंडेशन प्रेरित आळंदी स्वच्छता जनजागृती अभियान अंतर्गत विविध सेवाभावी संस्था व श्री साई कन्सल्टन्सी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत आळंदी स्वच्छता अभियान राबवत आहेत. त्यानुसार, दर रविवारी परिसरातील विविध सामाजिक संस्था, शालेय विद्यार्थी, आळंदीकर नागरिक सकाळी काही तास श्रमदान करत आळंदी स्वच्छता अभियानात सहभागी होत आहेत. यावेळी बाह्यवळण मार्गाच्या दोन्ही बाजूंची स्वच्छता करण्यात आली. या भागात लावण्यात आलेल्या वृक्षांना पाणी देण्यात आले. तसेच शुभम पाटील यांनी उपस्थितांना माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ दिली.
दरम्यान, या अभियानामध्ये सेवाभावी संस्था, नागरिक, शालेय संस्था, भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव, आळंदी स्वच्छता जनजागृती अभियानचे मुख्य समन्वयक अर्जुन मेदनकर यांनी केले आहे.